भाजपने उद्धव ठाकरे यांच्यासारखीच एकनाथ शिंदे यांची फसवणूक केल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. भाजपकडून पैसा व सत्तेच्या बळावर लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी के
.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महायुतीने यंदाची विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली. त्यामुळे शिंदे यांची फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा होती. पण भाजपने त्यांची उद्धव ठाकरे यांच्यासारखीच फसवणूक केली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव यांची फसवणूक केली होती. त्याच पद्धतीने आता शिंदे यांना फसवण्यात आले. सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीत पैसा व सत्तेचा गैरवापर करून लोकशाही नष्ट करण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करून पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे वाटले. पण निवडणूक आयोगाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्याने केवळ बघ्याची भूमिका घेतली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी ईव्हीएमवरही संशय व्यक्त केला. ते म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाला स्वायत्तता आहे. सध्या मुक्त वातावरणात पारदर्शकपणे निवडणुका घेतल्याचा दावा केला जात आहे. पण त्यानंतरही जनतेच्या मनात ईव्हीएमविषयी संशय आहे. आयोगाला ईव्हीएम सुरक्षित वाटते, तर मग सर्व मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या मोजणीला किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याला सरकार का घाबरते?
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ठराविक मतदान यंत्रांतील मतचिठ्ठ्यांची तपासणी झाली, तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण, ठराविक मतदान यंत्रांमधील डेटा नष्ट केला जाऊ शकतो, असे चव्हाण म्हणाले.
4 महिन्यांत लोकांचे मन बदलणे अशक्य
पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीवरही घणाघात केला. कोणत्याही निवडणुकीत जनतेचा विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. पण जनतेला ईव्हीएमवर थोडाही विश्वास राहिला नाही. त्यामुळे जनतेतून पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी होत आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने केंद्रातील भाजपा सरकारवर तीव्र नाराजी दर्शवली. पण त्यानंतर अवघ्या 4 महिन्यांत अचानक मतदारांच्या मनात एवढा बदल होऊन भाजप महायुती सरकारविषयी एवढा विश्वास संपादन होणे ही अशक्य व अविश्वसनीय गोष्ट आहे, असे ते म्हणाले.