राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवताना कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची दुबई विमानतळावर भेट घेतली होती, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ऐन
.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे मुंबईतील गँगवॉरचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा आरोप केला आहे.
शरद पवारांच्या परदेश दौऱ्यांवर सवाल
प्रकाश आंबेडकर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत म्हणाले, शरद पवार 1988 ते 1991 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. या काळात ते एका परदेश दौऱ्यावर गेले होते. ते भारतातून लंडनला गेले. तेथून कॅलिफोर्नियाला त्यांनी 2 दिवस मुक्काम केला. तिथे त्यांनी एक बैठकही घेतली. ही बैठक कुणासोबत झाली? हे स्पष्ट झाले पाहिजे.
कॅलिफोर्नियातून शरद पवार लंडनला व तेथून दुबईला आले. त्यांनी दुबई विमानतळावरच कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची भेट घेतली. यावेळी दाऊदने पवारांना सोन्याचा हार भेट दिला. त्यानंतर सायंकाळच्या विमानाने पवार लंडनला गेले आणि तेथून 2 दिवसांनी पुन्हा मायदेशी परतले.
देशातील कोणताही मुख्यमंत्री केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय परदेश दौरा करू शकत नाही. त्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने शरद पवारांच्या दौऱ्याला मान्यता दिली होती का? कॅलिफोर्नियातील बैठक व दाऊदची भेट या दोन्ही घटनांना केंद्राची परवानगी होती का? दिली होती तर त्या भेटीचा अहवाल त्यांनी केंद्राला सुपूर्द केला होता का? याचा खुलासा विद्यमान केंद्र सरकारने केला पाहिजे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या मालिकेमुळे याचा खुलासा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
आपल्याला मागचा इतिहास पहावाच लागेल
महाराष्ट्रात शांतता राखण्यासाठी कोणत्या पक्षांना मतदान करायचे हे मतदारांनी ठरवले पाहिजे. मी निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम हे विधान करत आहे. महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित होण्यासाठी केंद्र व राष्ट्रवादी काँग्रेस या गोष्टींचा खुलासा करेल असा माझा विश्वास आहे. मधल्या काळात बॉम्बस्फोट व गोळीबाराचे प्रकार थांबले होते. पण काही दिवसांपासून ते पुन्हा सुरू झालेत. बाबा सिद्दीकी यांची उघडपणे हत्या करण्यात आली. ही परिस्थिती पाहता आपल्याला मागचा इतिहास पाहावा लागेल. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने जुने रेकॉर्ड बाहेर काढून शरद पवार व दाऊदच्या भेटीचा तपशील सार्वजनिक करावा.
माझे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1954 साली तत्कालीन केंद्र सरकारने गांभिर्याने घेतले नाही. त्यामुळे 1962 चे युद्ध झाले. आगामी काळ अत्यंत कठीण राहणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या सत्तेत योग्य माणसे सत्तेत येणे गरजेचे आहे. असे झाले तरच भविष्यातील आव्हानाला तोंड देता येईल. अन्यथा 1990 किंवा 2000 सालाची पुनरावृत्ती होईल, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला.