राज्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेश शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला
.
गेल्या वर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे नोंदणी शुल्क मुंबईसाठी वेगळे आणि उर्वरित विभागांसाठी वेगळे होते. त्यानुसार मुंबईसाठी 225 रुपये तर उर्वरित विभागांसाठी 125 रुपये शुल्क आकारण्यात येत होते. आता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशांसाठी शिक्षण विभागाने स्वतंत्र संकेत स्थळाची निर्मिती केली आहे. याच्या माध्यमातून 15 मेपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी करण्यात येणार असून, 19 मेपासून विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
शिक्षण विभागाकडून अकरावीच्या प्रवेशांसाठी https://mahafyjcadmissions.in हे अधिकृत संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. नवे संकेतस्थळ9 मेपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शाळा, महाविद्यालयांनी 15 मेपर्यंत नोंदणी करून त्याचे प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल 15 मेपूर्वी जाहीर होणे अपेक्षित आहे, तर 19 ते 28 मे या कालावधीत विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे अपेक्षित असून, प्राधान्यक्रमही नोंदवले जाणार आहेत.
15 ऑगस्टपर्यंत अकरावीचे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून सुमारे 16 लाख 76 हजार जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग 11 ऑगस्टपासून सुरू केले जाणार आहेत. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील जवळपास 11 हजार 700 कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या सुमारे 16 लाख 76 हजार जागा उपलब्ध होणार असून, या माध्यमातून अकरावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रवेशावर लक्ष राहणार आहे.