छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. फुलंब्री शहरात मात्र या चौपदरीकरणाचा फायदा झाला नाही. मंगळवारी दुपारी १२ ते १.३० वाजेदरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. या वेळी भर उन्हात वाहनधारकांना थांबावे लागले. चारचाकी वाहनांपेक्षा द
.
छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. येथील महात्मा फुले चौक टी पॉईंट ते बसस्थानक हा रस्ता चौपदरीकरण असूनही दिवसभर वाहतूक कोंडी होते. रस्त्यावर लागलेल्या हातगाड्या, चहाचे दुकान, पान टपऱ्या आणि ज्यूस सेंटरमुळे वाहतुकीस मार्ग राहत नाही. दिवसभर वाहतूक तासंतास ठप्प असते. पोलीस आहेत की नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या वेळेस पोलीस अधूनमधून येतात. त्यावेळी वाहतूक सुरळीत होते. त्यानंतर जैसेथे वाहतूक होत असल्याने स्थानिक पोलीस प्रशासनावर वाहनधारक शंका व्यक्त करीत आहेत. या रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक ठप्पाचा सामना नगरपंचायत मुख्याधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी यांनाही करावा लागतो. मात्र ते कार्यालयात आले की झालेला त्रास विसरून जातात की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
गुजरातच्या पर्यटकांना बसला फटका
वेरूळ पाहून अजिंठा लेणी पाहून भुसावळ जाऊन गुजरातला जाण्याचा विचार होता. पण येथे तासापासून अडकलो.आता अजिंठा लेणी पाहायला मिळणार नाहीत. ट्रेनचा वेळ चार वाजता आहे. यामुळे माघारी परतावे लागणार, अशी प्रतिक्रीया गुजरात येथील पर्यटक दिनेश चौधरीया यांनी दिली.
जागा भाड्याने, वाहतुकीचे तीन तेरा
या नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास विदेशी पर्यटकांना होतो. याचा संदेश चुकीचा जातो, याकडे लक्ष दिले पाहिजे. या गंभीर प्रश्नावर साबावि, पोलीस ठाणे, नगरपंचायत यांनी एकत्रित बैठक घेऊन या रस्त्यावरील अतिक्रमण काढावे. दुकानदारांनी समोरील जागा भाड्याने देऊन रस्त्याची कोंडी केली आहे, त्यांच्यावर कारवाई करावी. महात्मा फुले चौकात सिग्नल यंत्रणा बसवावी आणि दोन पोलीस या चौकात कार्यान्वित करावेत. नसता तीव्र आंदोलन करणार, असे सामाजिक कार्यकर्ते सुमीत प्रधान यांनी सांगितले.