मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या 7, 8 व 9 या 3 खंडांसह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर व इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर
.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जनता’ हे वृत्तपत्र 1930 ते 1956 दरम्यान प्रकाशित झाले होते. हे वृत्तपत्र आंबेडकरी चळवळीचा एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे अप्रकाशित व प्रकाशित साहित्य पुन्हा प्रकाशित करून ते सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित कॅबिनेट हॉलमध्ये झालेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उपरोक्त खंडांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, समितीचे सदस्य सचिव डॉक्टर प्रदीप आगलावे, सदस्य योगीराज बागूल, ज. वि. पवार, डॉक्टर संभाजी बिरांजे आदींसह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. आत्तापर्यंत डॉक्टर आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने जनताचे 6 खंड प्रकाशित केलेत.
कोणत्या खंडात कशाचा समावेश?
‘जनता’ खंड 7 | या खंडात 12 फेब्रुवारी 1938 ते 28 जानेवारी 1939 पर्यंतच्या एकूण 48 अंकाचा समावेश आहे. |
‘जनता’ खंड 8 | या खंडात 4 फेब्रुवारी 1939 ते 27 जानेवारी 1940 पर्यंतच्या एकूण 48 अंकाचा समावेश आहे. |
‘जनता’ खंड 9 | या खंडात 3 फेब्रुवारी 1940 ते 1 फेब्रुवारी 1941 पर्यंतच्या एकूण 48 अंकाचा समावेश आहे. |
वंचितांचे प्रश्न उचलून धरण्याचा प्रयत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा पहिला संप पुकारण्यात आला होता. हा संप 1928-1934 या कालावधीत म्हणजे तब्बल 7 वर्षे रायगड जिल्ह्यातील चरी या गावात झाला. बाबासाहेबांनी खोती पद्धत रद्दबातल करण्यासाठीही संघर्ष केला. त्यांनी 17 सप्टेंबर 1937 रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या एक विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले होते. त्यानंतर 10 जानेवारी 1938 रोजी आंबेडकर व कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली 25 हजार शेतकऱ्यांचा एक मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला होता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता आदी विविध नियतकालिके सुरू केली होती. या माध्यमातून त्यांनी दलितांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आंबेडकरांनी या संस्थेमार्फत 1946 मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, 1950 मध्ये तत्कालीन औरंगाबादमध्ये (छत्रपती संभाजीनगर) मिलिंद महाविद्यालय, 1953 मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर 1956 मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सुरू केले.