हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कळमनुरी बायपास जवळ लाईव्ह घेऊन जाणाऱ्या टाटा एस वाहनाचा बर्निंग थरार या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी बुधवारी रात्री (ता. 23) अनुभवला. या वाहनातील प्लायवूड सह संपूर्ण वाहन जळून खाक झाले.
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदोर येथून एका टाटा एस वाहनामध्ये प्लायवूड भरून सदर वाहन नांदेड येथे आले होते. आज सायंकाळच्या सुमारास सदरील वाहन नांदेड कडून जालन्याकडे निघाले होते. कळमनुरी मार्गे समृद्धी महामार्गाने प्रवास करण्याच्या उद्देशाने चालकाने वाहन कळमनुरी मार्गे आणले होते.
दरम्यान हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कळमनुरी बायपास जवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वाहन आले असताना अचानक वाहनाच्या पाठीमागील भागातून धूर निघू लागला. काही वेळातच मोठी आग भडकली. वाहनामध्ये प्लायवूड असल्यामुळे बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. वाहनाच्या पाठीमागील संपूर्ण भाग आगीने वेढला गेला. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर चालक व क्लीनर यांनी वाहनातील कागदपत्रे ताब्यात घेऊन बाजूला गेले.
वाहन चालकांनी या घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, जमादार रवी इंगोले, जगन पवार, गुलाब जाधव, प्रशांत शिंदे, गजानन होळकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले होते. कळमनुरी पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये वाहनातील प्लायवूड व संपूर्ण वाहन जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी टाटा एस वाहनाच्या बर्निंगचा थरार अनुभवला. सदर वाहन जळीत प्रकरणात कळमनुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान तीन दिवसांपूर्वीच याच मार्गावर एक कार पेटली होती. यामध्ये संपूर्ण कार जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर तीन दिवसाच्या अंतरात ही दुसरी घटना घडली आहे.