Raigad News : रायगडमध्ये मागील काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित करणाऱ्या घटना घडत असल्यानं प्रशासन आणि यंत्रणांच्या चिंतेत भर पडली आहे. रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील सातत्यानं वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना आता चिंतेचा विषय होऊ लागल्या आहेत.
मागील 4 दिवसांत एकट्या रायगड जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या घटना समोर आल्या. तळा शहरात बांधकाम सुरू असलेल्या घरात बोलावून एकाने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी गणेश रसाळ याच्याविरोधात तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तर कर्जतमध्ये स्कूल बसचा चालक दोन अल्पवयीन मुलींशी चाळे करीत असल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी करण पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी महाड शहरात देखील असाच प्रकार उघडकीस आला. शिकवणी वरून परतणाऱ्या दोन लहान मुलींना सोसायटीच्या कार्यालयात बोलावून त्यांच्याशी लैंगिक चाळे करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला. लागोपाठच्या या घटनांमुळे रायगड जिल्ह्यात लहान मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.
बस मधील क्लीनरचं अश्लील कृत्य…
रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाणे हद्दीत अवघ्या पाच वर्षाच्या निरागस चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शाळेतील बस मधील क्लीनरनेच हे कृत्य केलं असून, हा बस क्लीनर वदप येथील राहणारा असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी “पोक्सो”कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसाने या नराधमाला अटक केली.
पीडित मुलीने आपल्या आईला दिलेल्या माहितीमध्ये क्लीनर त्यांना ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर नेऊन तिच्या शरीराला अश्लील रित्या स्पर्श करत, या विकृत कृत्याने पालकांमध्ये भयानक संताप निर्माण झालाय. या सर्व प्रकाराबद्दल पालकांनी बसचे मालक कमलेश ठाकरे यांना विचारले असता त्यांनी पालकांना उडवाउडविची उत्तरं द्यायला सुरवात केली . बदलापूरमधील घटना ताजी असताना अशाच प्रकारची घटना घडणे हे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणारे आहे. दरम्यान कर्जत मध्ये ही अशी विकृती समोर आल्याने पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
वाईट बाब म्हणजे ही घटना इतकी गंभीर असतानाही देखील हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला संध्याकाळची रात्र करावी लागली, आलेल्या पालकांना संध्याकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत बसुन ठेवण्यात आले आणि इथंच अनेकांचा संताप झाला. तेव्हा रायगडमध्ये आता राज्य प्रशासनानं जातीनं लक्ष घालण्याची गरज असल्याचं स्पष्ट मत आणि मागणी सामान्य नागरिकांनी करत सुरक्षिततेही हमी मागितली आहे.