Nashik Crime: आता लग्नाळू मुलांना सावध करणारी एक बातमी समोर येतेय. ग्रामीण भागात आधीच लग्नासाठी मुली मिळत नाहीयत. त्यात आता नाशकात एक वेगळाच प्रकार घडलाय. नववधूनं सासरच्या लोकांना बेशुद्ध करुन घरातले दागिने चोरून पळ काढलाय.
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील लखमापुर गावातील वसंत पाचोरेंचं नुकतंच लग्न झालं. लीना मांदळे असं यातील नववधूचं नाव आहे. चेहऱ्यावरुन साधीभोळी दिसत असली तरी तिचे कारनामे चक्रावून टाकणारे आहेत. या सोज्वळ चेहऱ्याने अनेकांना लग्नाच्या आमिषांनं फसवलंय. सासरच्यांना नांदेडची असल्याचं सांगणारी ही नववधू मूळची छत्रपती संभाजीनगरची आहे.
लीना मांदळे काही दिवसांपूर्वी ओळखीतल्या 2 पुरुष आणि एका महिलेला घेऊन लखमापूरला आले. तिथं वसंत पाचोरे या तरुणाला मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी पसंत पडल्यावर मुलीकडच्यांना दोन लाख रुपये देण्याचं ठरलं.
इतकंच नाही तर नाशिकमध्ये ऐनवेळी 50 हजार रुपये जास्तीचे घेत नववधूच्या परिवारानं रजिस्टर लग्न केलं. नववधू लीना सासरी नांदायला आली. बऱ्याच मुली बघितल्यावर मुलाचं लग्न झालं याने पाचोरे कुटुंब खूश होतं. मात्र लग्नाच्या चौथ्याच दिवशी लीनानं सासरच्या लोकांना जेवनातून गुंगीचे औषध दिलं. आणि लाखोंचे दागिने घेऊन पोबारा केला.
गुन्हा दाखल झाल्यावर पोसिसांनी नववधूसह तिच्या संपूर्ण टोळीला बेड्या ठोकल्यात. लग्नासाठी 1 लाख 10 हजार रुपये घेणारे एजंट साहेबराव शिंदे, बहीण सुरेखा कडवे यांनाही पोलिसांनी अटक केलीय.
नाशकात सध्या या लुटारु नववधूची बरीच चर्चा रंगलीय. मात्र गावाकडची लग्नाळू मुलं हेरून, त्यांच्यांशी रितसर लग्न करुन, नंतर त्यांचंच घर लुटणाऱ्या अशा नववधूंच्या अनेक टोळ्या मागच्या अनेक वर्षापासून राज्यभर कार्यरत आहेत. त्यामुळे अशा टोळ्यांना बळी पडू नये यासाठी लग्नाच्या बाबतीत वाहावत न जाता, संपूर्ण शहानिशा करून, खबरदारी घेणं गरजेचं आहे.