नांदेड येथील शेतकरी हरिदास बोंबले यांच्या आत्महत्येवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सदर आत्महत्या नाही सरकारी विश्वासघाताने घ
.
बेभरवशी निसर्ग, शेतीमालाचे पडलेले भाव, कर्जाचा वाढता डोंगर आणि संसारगाडा चालविण्याच्या विवंचनेत शेतकरी आत्महत्यांचे सत्रच सुरू आहे. शासनाकडून या प्रकरणी वेगवेगळी उपाययोजना केली जात आहे. पण शेतकरी आत्महत्या थांबत नाही. ताजी घटना नांदेड येथे घडली आहे. येथील हरिदास विश्वंभर बोंबले यांनी बँकेच्या थकबाकीच्या नोटीसीच्या भीतीने आपली जिवनयात्रा संपवली. हर्षवर्धन सपकाळ व जयंत पाटील यांनी या प्रकरणी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
सरकारी विश्वासघाताने घेतलेला बळी
हर्षवर्धन सपकाळ आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, आत्महत्या नाही सरकारी विश्वासघाताने घेतलेला बळी. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी येथाल हरिदास विश्वंभर बोंबले या शेतकऱ्याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्ज वसुलीच्या दबावाला कंटाळून आपले जीवन संपवले. नापिकी, पीक विमा नाही, शेतमालाला भाव नाही, सरकारी मदत नाही आणि सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासनही पाळले नाही यामुळे जगणे असह्य झालेले शेतकरी गळफास लावून आपले जीवन संपवू लागले आहेत.
हरिदास बोंबलेची आत्महत्या ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! सरकारने कुंभकर्णी झोपेतून आणि राक्षसी बहुमताच्या नशेतून बाहेर पडून निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे, असे ते म्हणाले.
शेतकरी इतका हतबल केव्हाच नव्हता
दुसरीकडे, जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हरिदास बोंबले यांनी कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तर गव्हाचे बोगस बियाणे निघाल्याने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने रोटावेटर फिरवून उभे पिक जमीनदोस्त केले. महाराष्ट्रातील शेतकरी इतका हतबल कधीच नव्हता. ही काय परिस्थिती निर्माण केली आहे?
शेती साहित्य खरेदी करताना शेतकऱ्याला महागाईची झळ बसते, त्याला जीएसटीचा भुर्दंड भरावा लागतो. खताच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कर्जमाफी तर फक्त सत्ताधाऱ्यांच्या शब्दाची वाफ आहे हे शेतकऱ्याने ओळखले आहे. सततचा दुष्काळ, अवकाळी पाऊस ह्याने तर शेतकरी पिचला आहेच, पण सरकारच्या असंवेदनशीलतेने त्याला हतबल बनवले आहे. हे चित्र अत्यंत करुण आहे. आपल्या अन्नदात्याच्या घामाचे मोल काय?
एकाबाजूला श्रीमंत धनदांडग्या लोकांसाठी सरकार खैरात वाटत सुटले आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी कुटुंब १ – २ लाखांच्या कर्जपायी घरचा आधार गमावत आहेत. शेतकरी स्व. हरिदास बोंबले यांच्या कुटुंबाला न्याय मिळायलाच पाहिजे. तसेच सरकारने बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर तत्काळ फौजदारी खटला दाखल केला पाहिजे. शेतकऱ्याला नुकसानीचा परतावा कंपनीकडून मिळालाच पाहिजे ही आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.