तीन पक्षात काही खात्यावरून वाद आहेत. येत्या एक दोन दिवसात तिघे जण एकत्र बसून चर्चा करतील, त्यानंतर एक दोन दिवसांमध्ये खात्याचे वाटप होईल, असे शिवसेना नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
.
दरम्यान गुलाबराव पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काम सुरू केले आहे. एक ते दोन दिवसांमध्ये खाते वाटप जाहीर होईल. खाते वाटप करण्यास उशीर झालेला नाही. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार देखील झाला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तसेच अनेक आमदारांना मंत्रिपद देखील मिळाले. मात्र, सध्या खातेवाटप कधी होणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कोणतेही खाते मागितले नाही
गुलाबराव पाटील म्हणाले की, कुठलेही खाते मिळाले तरी शेवटी खाते हे खाते असते. कॅबिनेट मंत्री होणे एवढे सोपे नाही. कॅबिनेट मंत्री होणे एवढे सोपे नाही, पाच वर्षांचा काळ काढल्यानंतर पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद भेटले आहे. मला वाटते दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपद भेटणे ही जळगाव जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे पालकमंत्री असो किंवा कोणते खाते मी कुठल्याही गोष्टीसाठी मागणी केलेली नाही. नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
देशमुख हत्या प्रकरणी कुणालाही सोडणार नाही
गुलाबराव पाटील म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस सभागृहामध्ये निवृत्त न्यायाधीश किंवा सध्याचे न्यायाधीशांमार्फत या संपूर्ण घटनेची चौकशीची मागणी केली आहे. देशमुख यांची हत्या निश्चितपणे निषेधार्ह आहे. चौकशीत कोणीही दोषी आढळला तर कोणालाही सोडले जाणार नाही.