संविधानाच्या मुद्यावर विरोधक केवळ राजकारण करत असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विरोधक संविधान बदलले जाणार असल्याचा अपप्रचार करतात. पण संविधान कुणीही बदलू शकत नाही, त्यात केवळ दुरुस्ती होऊ शकते, असे ते
.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधक ईव्हीएम यंत्रावर आक्षेप घेऊन आंदोलन करत आहेत. ते सर्वोच्च न्यायालयात देखील गेले आहेत. पत्रकारांनी गुरुवारी याविषयी माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना छेडले असता, ते म्हणाले, देशाच्या लोकशाहीत कोणालाही काहीही करण्याची परवानगी आहे. विरोधकांनी टीका करताना केवळ शब्द व्यवस्थित वापरावे. मात्र सध्या तसे होताना दिसत नाही. संविधानाच्या मुद्द्यावर देखील विरोधक राजकारण करत आहेत. संविधानाबद्दल मला प्रचंड आदर आहे, पण त्याचे जाहीर प्रदर्शन मी करत नाही. संविधान बदलले जाणार असा अपप्रचार विरोधक करतात, मात्र, संविधान हे कोणीही कधीही बदलू शकत नाही. त्यामध्ये केवळ दुरुस्ती होऊ शकते.
‘पुणे पुस्तक महोत्सवा’अंतर्गत ‘शांतता… पुणेकर वाचत आहे’ या उपक्रमात पुणे शहरातील अनेक संस्थांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम आप्पा बळवंत चौक, तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे पार पडला. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेत लेखक सागर देशपांडे यांचे दुर्दम्य आशावादी डॉ .रघुनाथ माशेलकर या पुस्तकाचे वाचन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे हा उपक्रम राबवला जात आहे. मागील वर्षी पुणे पुस्तक मोहत्सव मध्ये ११ कोटी रुपयांची पुस्तक विक्री झालेली आहे. यंदा पुस्तक मोहत्सव मध्ये ६०० स्टॉल असणार आहे. धावपळी जीवनात आपण पुस्तक वाचनासाठी वेळ काढला पाहिजे. मी कोल्हापूर मध्ये तीन आणि पुण्यात कोथरूड मध्ये तीन अशी सहा फिरती वाचनालय सुरू केली आहे. वाचनाचे सध्या अनेक प्रकार डिजिटल युगात आलेले आहे. त्याचा ही वापर आपण केला पाहिजे. तरुणाई पुस्तक वाचत नाही असा आरोप केला जातो, पण तसे नाही. समाजात वाचन आवड निर्माण करण्यासाठी ‘शांतता पुणेकर वाचत आहे’ हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. पुस्तक वाचन मधून व्यक्तीचे विचार प्रगल्भ होतात. राजकीय धावपळीमुळे मला पुस्तक वाचनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र, माझी पत्नी अनेक पुस्तकांचे वाचन करते आणि चांगली पुस्तके मला वाचनासाठी देत असते.