नीलेश लंके हा उगवता सूर्य आहे, तो खचत नाही, असे म्हणत नीलेश लंके यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीत पत्नी राणी लंके यांचा काठावर पराभव झाला. हा निश्चितच चिंतानाचा भाग आहे. मात्र येणारा काळ आपला आहे. असे खासदार नीलेश लंके म्हणाले
.
नीलेश लंके म्हणाले, या निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्या दुरूस्ती करू. आता आरोग्य शिबिराचे आयोजन करून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरूवात करू. आपण आपल्या कामाच्या जोरावर राज्यात ओळख निर्माण केली आहे. विधानसभेत पराभव झाला म्हणून आपले राजकारण संपलेले नाही. चुकांच्या दुरूस्त्या करा. समाजाला दोष देऊ नका, असा सल्ला लंके यांनी दिला आहे.
पुढे बोलताना नीलेश लंके म्हणाले, या निवडणुकीत यांत्रिकीकरणाने घात केला आहे. कोणी काही म्हणत असले तरी मी आमदार नाही तर जिल्हयाचा खासदार आहे. प्रस्थापित व घराणेशाही विरोधात माझा उदय झाला आहे. त्यामुळे संघर्ष मला नवा नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपण सतर्क राहिलो असतो तर आपल्या वाट्याला हा पराभव आला नसता, एकमेकांमधील जिरवाजिरवीचे राजकारण आता बंद करा.
पुढे बोलताना नीलेश लंके म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मी त्यांचा पराभव केला म्हणून डॉ. सुजय विखे यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून माझ्याविरोधात ट्रॅप लावला. पण थांबा महिनाभरात तुम्हाला गुड न्यूज देतो. निवडणूक ही बंदुकीची गोळी असते. एकदा सुटली की सुटली. राजकारणात आज जाती धर्माचा रंग दिला जात असून एक दिवस भारताचा श्रीलंका झाल्याशिवाय राहणार नाही. देश एकसंघ राहण्यासाठी जाती-पातींचे राजकारण योग्य नाही.