ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचा आरोप करत तीन दिवस आत्मक्लेष आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज शरद पवार, अजित पवार यांच्यासारखे नेते मंडळींनी आढाव यांची भेट घेतली. य
.
बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलेले आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून आल्या. त्यावेळी जनतेने दिलेले जनमत आम्ही मान्य केले. लोकसभा निवडणुकीत मी देखील बारामती मध्ये जो उमेदवार दिला होता त्याचा 48 हजार मतांनी पराभव झाला. तर दुसरीकडे विधानसभेत त्याच लोकांनी मला एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी केले. त्यामुळे जनतेला कोण प्रश्न विचारावे? त्यांनी ठरवले त्याला निवडून दिले असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला असेल तर त्याला आम्ही काय करणार? असा प्रश्न देखील अजित पवार यांनी उपस्थित केला. बाबा आढाव यांनी मांडलेल्या काही गोष्टी या सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहे. तर काही गोष्टी निवडणूक आयोगाच्या संबंधित असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. मात्र, जनतेचा कौल पाच महिन्यात बदलत असेल तर तो मान्य केला पाहिजे, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा या एकत्र एकत्रित झालेल्या निवडणुकीचा दाखला दिला. एकाच मतदान केंद्रावर एका बाजूला शरद पवार यांना लोकसभेसाठी लोकांनी मतदान केले तर विधानसभेसाठी मला मतदान केले होते. मात्र शरद पवार यांची लीड माझ्यापेक्षा पन्नास हजारांनी जास्त होती. त्यावेळी लोकांना वाटले असेल तिथे मला विधानसभेत पाठवू नये. मात्र, त्या वेळी मी देखील असा प्रश्न उपस्थित केला नव्हता. अशी आठवण त्यांनी करुन दिली.
विरोधकांच्या योजनेचा दाखला
लाडकी बहिण योजनेवर बाबा आढाव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला देखील अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले. संजय गांधी निराधार योजनेचे उदाहरण देखील अजित पवार यांनी दिले. साठ रुपयापासून सुरू झालेल्या योजनेचे आता दीड हजार रुपये झाले आहेत. ती योजना देखील चालूच आहे. या माध्यमातून जनतेला मदत करणे हा एकच हेतू असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. आम्ही बहिणींना दीड हजार रुपये दिले तर 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील तीन हजार रुपयांचे प्रलोभण दाखवलेच होते ना? असा प्रश्न देखील अजित पवार यांनी उपस्थित केला. लाभार्थ्यांना लाभ देण्याचे निर्णय आम्ही घेतले तसे मध्य प्रदेश, कर्नाटक मध्ये देखील महिलांसाठी योजना सुरू आहेत. दिल्लीमध्ये देखील अरविंद केजरीव यांनी अनेक योजना मोफत केल्या आहेत. शंभर युनिट पर्यंत वीज देण्याचे आश्वासन त्यांनी पंजाब मध्ये देखील दिले आहे.
संसदीय मंत्र्यांची भेट घेणार
विरोधकांच्या बाजूने निकाल लागला तर, ईव्हीएम चांगले आणि विरोधात निकाल लागला की, ईव्हीएम वाईट, असे योग्य नसल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. तुमचे काही मुद्दे असतील तर ते मांडण्याची संसदेमध्ये परवानगी द्यावी अशी मागणी आम्ही दिल्लीत संसदीय कामकाज मंत्र्यांडके करणार असल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.
या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…
शरद पवारांचा बाबा आढाव यांच्या EVM विरोधी आंदोलनाला पाठिंबा:आंदोलनस्थळी दिली भेट; सरकारला विरोधक नको असल्याचा आढाव यांचा आरोप

सरकारी तिजोरीतून लोकांना पैशांचे वाटप करण्यात आले असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केला आहे. बाबा आढाव यांचे तीन दिवसापासून सुरू केले आहे. त्यांच्या उपोषण स्थळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी भेट दिली. ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप देखील बाबा आढाव यांनी केला आहे. सरकारी तिजोरीची लूट सुरू असल्याचे यावेळी आढाव म्हणाले. राज्यभरातून या उपोषणाला पाठिंबा मिळत असल्याचा दावा देखील यावे उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. पूर्ण बातमी वाचा….
शरद पवारांकडून पुन्हा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह:म्हणाले – अखेरच्या 2 तासांतील टक्केवारी अत्यंत धक्कादायक, जनतेने उठाव करणे आवश्यक

देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यासंबंधीची अस्वस्थता ती सर्व भागात दिसून येत आहे. या निवडणुकीच्या निकालाबद्दल जनमत हे बाबा आढाव यांनी घेतलेल्या भूमिकेतून व्यक्त होत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर दिसून आला. तो यापूर्वी कधीही बघितला नव्हता. स्थानिक पातळीवरील निवडणूक असतात, त्यामध्ये अशा तक्रारी कुठे न कुठे ऐकायला मिळतात. मात्र संपूर्ण राज्याची आणि देशाची निवडणूक असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सर्व यंत्रणा हातात घ्यायची, असे चित्र यापूर्वी कधीही दिसले नव्हते, असे देखील पवार यांनी म्हटले आहे. असेच काही या निवडणुकीत महाराष्ट्रात घडले आहे आणि त्याचा परिणाम होऊन लोकांची अस्वस्थता वाढली असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा….