काही तासातच राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषण होणार आहे. महाविकास आघाडीच्या निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू असून ही चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातच महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. मविआ 119-86-75 असा फॉर्म्युल्याने जागा
.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक 119, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 86 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 75 जागा लढणार आहे. तर शेतकरी कामगार पक्ष 3, समाजवादी पक्ष 3 आणि कम्युनिस्ट पक्षाला 3 जागा देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, राज्यातील 10 ते 15 विधानसभा मतदारसंघाचा प्रश्न अद्याप सुटला नसून या जागांवरील तिढा कायम असल्याचेही सांगितले जात आहे.
शरद पवारांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस 13 जागांवर विजय मिळवत राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 10 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 8 जागांवर विजय मिळवत स्ट्राईक रेटच्या गणितात सरस ठरला होता. असे असतानाही शरद पवार गटाने विधानसभेच्या जागावाटपांत 75 जागांवर लढण्याची तयारी दर्शवली आहे. या भूमिकेमागे शरद पवारांची काय खेळी आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कविर्तक लावले जात आहेत.
महायुतीचे देखील जागावाटप जवळपास निश्चित
महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजप 160 जागा लढवणार आहे. उरलेल्या 128 पैकी शिंदे सेनेला 80 जागा तर राष्ट्रवादी दादा गटाला 48 जागा जवळपास निश्चित आहेत. यातून तिन्ही पक्षांना मित्रपक्षांना जागा सोडायच्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. स्वत: भाजपमध्येही छुपी बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे पक्षशिस्तीमुळे उघडपणे भाजपतील कुणी बंडखोरी करण्याचे धाडस दाखवणार नाही.
मात्र, आतून विरोध होऊ शकतो. हे लक्षात घेता कोणती जागा, कोणत्या पक्षाला सुटली हे जाहीर केले जाणार नाही. कारण ते माहिती झाले तर बाहेरून आलेले बंडखोरी करीत इतर पक्षात जाऊ शकतात. म्हणून आचारसंहिता जाहीर झाली तरी यादी जाहीर करण्याची घाई महायुती करणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. भाजपने 150 ते 160 जागा लढवल्यास 90 ते 95 जागा निवडून येऊ शकतात, असा प्राथमिक अहवाल आहे.