बिलाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना 2024 सुरू करण्यात आली आहे. योजनेस छत्रपती संभाजीनगर परिमंडलात उत्तम प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत 1654 ग्राहकांनी 2 कोटी 81 लाख
.
31 मार्च 2024 पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पीडी) महावितरणच्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकीत बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. योजनेचा कालावधी 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 आहे. 31 मार्च 2024 पूर्वी थकबाकीमुळे कायमस्वरूपी खंडित झालेले छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील 3 लाख 23 हजार 555 ग्राहक या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. या ग्राहकांकडून महावितरणला मूळ बिलाची 571 कोटी 63 लाख रुपयांची रक्कम तसेच 175 कोटी 23 लाख रुपये व्याज आणि 7 कोटी 23 लाख रुपये विलंब आकार येणे आहे. तथापि, या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकित बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरुपातील दंड माफ करण्यात येईल. मूळ बिलाच्या 30 टक्के रक्कम भरून ऊर्वरित 70 टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळेल. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल. उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळेल.
योजनेचा असा लाभ घ्या
संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून किंवा महावितरणच्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक 1912 किंवा 1800-233-3435 किंवा 1800-212-3435 या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल. ज्या ग्राहकांना आपल्या वीजबिलाबाबत शंका किंवा तक्रार असेल त्यांनी महावितरणकडे ऑनलाईन तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
थकबाकीदारांनी सवलतीचा लाभ घ्यावा
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. तथापि, थेट कायदेशीर कारवाई करण्याच्या ऐवजी सुविधा म्हणून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी 1 सप्टेंबरपासून ही सवलतीची योजना लागू केली असून या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी चिंतामुक्त व्हावे, आवाहन महवितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.