‘काहीतरी ठोस करा,’ म्हणणाऱ्या राज ठाकरेंना CM देवेंद्र फडवणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले ‘त्यांना नक्की…’


Devendra Fadnavis on Raj Thackeray: महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण 2021 ते 2024 या काळात जवळपास 30 टक्क्यांनी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून व्यक्त केली आहे. राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

“मी अजून पत्र वाचलेलं नाही, पण बेपत्ता होणाऱ्या मुलींसंदर्भात आकडेवारी सहित त्याची कारणं दिली आहेत. परत किती येतात हेही सांगितलेलं आहे. यात महत्त्वाचा मुद्दा आहे की एखादी मुलगी घरून भांडून गेली आणि परत तीन दिवसात आली तरीही आपण बेपत्ता तक्रार दाखल करतो त्यामुळे त्याची संख्या मोठी दिसते. वर्षभरात 90 टक्क्यांच्या वर मुली परत आणतो. उरलेल्या पुढच्या वर्ष, दीड वर्षात परत येतात, त्यांनी नेमकं काय पत्र लिहिले आहे ते मी न वाचल्याने उत्तर देऊ शकणार नाही, मात्र ज्या काही शंका असतील त्यावर मी नक्की उत्तर देईन,” असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरेंनी पत्रात काय लिहिलं आहे?

“लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते?,” असे प्रश्न राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.

“यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ?,” असंही त्यांनी विचारलं आहे. 

पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे”. 

“खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही,” असं त्यांनी उपहासात्मकपणे म्हटलं आहे. 

“असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे,” असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *