‘हे अनाकलनीय…,’ ठाकरेंच्या शिवसेनेकडून CM फडणवीसांचं जाहीर कौतुक, म्हणाले ‘जरांगेच्या आंदोलनानंतर भलतेच लोक…’


Saamana Praises Devendra Fadnavis: मराठा आरक्षणाच्या लढ्यातील श्रेय जितके जरांगेंचे आहे, तितकेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आहे असं कौतुक ‘सामना’मधून करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला व आंदोलनाचा शेवट गोड झाला अशी कौतुकाची थाप त्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर नेहमी टीकेचे बाण सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर कौतुक करण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.  या सर्व प्रकरणात टीकेचे धनी मुख्यमंत्री झाले व भलतेच लोक ‘भले’ ठरले. हे अनाकलनीय आहे असं आश्चर्यही शिवसेनेने व्यक्त केलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

‘श्रेय जितके जरांगेंचे आहे, तितकेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे’

“आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे-पाटलांनी मुंबईत येऊन उपोषण, आंदोलन केले. ते यशस्वी झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठ्यांचे आंदोलन संयमी पद्धतीने हाताळले. त्यांच्यावर चौफेर शिव्यांचा वर्षाव होत असतानाही मुख्यमंत्री फडणवीस विचलित झाले नाहीत हे मान्य करावे लागेल व शेवटी ज्या गोष्टी मान्य करता येणे शक्य होते त्या सर्व मागण्या मान्य करून पाटील व त्यांच्या हजारो समर्थकांना गावाकडे परतण्याची वाट निर्माण करून दिली,” असं कौतुक सामनामधून करण्यात आलं आहे. 

 

“जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःचे प्राण पणास लावले. जरांगे-पाटील हा नक्कीच भला माणूस आहे. त्यांनी मनावर घेतले नसते तर मराठा समाजाला काहीच हाती लागले नसते. त्यामुळे जरांगे-पाटील यांचे या लढ्यातील श्रेय मोलाचे आहे, पण हे श्रेय जितके जरांगेंचे आहे, तितकेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आहे. मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला व आंदोलनाचा शेवट गोड झाला,” असंही त्यांनी म्हटलं आहे. 

‘हे अनाकलनीय…’ 

“हायकोर्टाने जरांगे यांना मुंबई सोडण्याची अंतिम मुदत दिल्यावर कोणाच्याच हाती काही राहिले नव्हते. पाटलांच्या समर्थकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तर तो उच्च न्यायालयाचा अवमान ठरला असता व दुसरेच कायदेशीर त्रांगडे निर्माण झाले असते. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी धावाधाव करून आंदोलकांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या. मुख्यमंत्री म्हणजे शेवटी सरकारच असतात. मंत्री वगैरे कितीही पॉवरफुल असले तरी सरकार हे मुख्यमंत्र्यांच्याच हुकुमाने चालते. याचा अर्थ शिंदे, अजितदादा पवार वगैरे लोकांना कमी लेखावे असे नाही, पण शिंदे हे भले आहेत हे सांगताना मनोज जरांगे-पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अतिजहाल भाषेचा वापर केला. या सर्व प्रकरणात टीकेचे धनी मुख्यमंत्री झाले व भलतेच लोक ‘भले’ ठरले. हे अनाकलनीय आहे,” अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. 

 

FAQ

1) मराठा आरक्षण म्हणजे काय?
मराठा आरक्षण ही महाराष्ट्रातील मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SEBC) म्हणून आरक्षण देण्याची मागणी आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करणे किंवा स्वतंत्र कोटा देणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे.

2) मराठा आरक्षणाची मागणी कधीपासून सुरू आहे?
मराठा आरक्षणाची मागणी 1980 च्या दशकात स्व. अण्णासाहेब पाटील यांनी प्रथम मांडली. 1982 मध्ये मुंबईत पहिला मोर्चा काढला गेला. 1997 मध्ये स्थानिक पातळीवर आंदोलन सुरू झाले आणि 2008-09 मध्ये शरद पवार, विलासराव देशमुख यांनी पाठिंबा दिला.

3) मराठा समाजाला आरक्षण का हवे आहे?  
मराठा समाजातील बहुतांश कुटुंबे शेतीवर अवलंबून असून, आर्थिक मागासलेपण आणि शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण (94% मराठा शेतकरी) यामुळे आरक्षणाची गरज आहे.  
शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये कमी प्रतिनिधित्व.  
मराठवाडा आणि विदर्भात विकासाचा अभाव, ज्यामुळे तरुणांना सरकारी नोकऱ्यांशिवाय पर्याय कमी आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *