Maharashtra Breaking News : केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) माहितीनुसार यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मान्सूनचं प्रमाण सामान्य असेल तर काही भागांमध्ये त्याची सरासरीहून अधिक हजेरी असेल. ज्यामुळं यंदाचे सणवार पावसातच जाणार की काय, असाच भाबडा प्रश्न अनेकांना आणि प्रामुख्यानं कोकणकरांना पडला आहे. दरम्यान, ऑगस्टची सुरुवात हवामानाच्या अंदाजानुसारच पावसानं झाली आहे.
तापमानात अचानक वाढ…. मुंबईत नेमकं काय घडलं?
अर्थात महाराष्ट्राच्या सर्वत भागांमध्ये पावसानं हजेरी लावलीये असं नाही. गेल्या 48 तासांपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बऱ्याच अंशी काळे ढग दूर होऊन लख्ख सूर्यप्रकाश पाहायला मिळाला, ज्यामुळं अचानक झालेल्या तापमानवाढीनं नागरिक हैराण झाले. तर, कुठं ढगाळ वातावरणानं पावसापूर्वीचा माहोल तयार केल्याचं पाहायाला मिळालं. सध्या मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईमध्ये बहुतांशी श्रावणसरींची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांमध्ये मराठवाड्यासह दक्षिण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान किनारपट्टी भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी असेल असाही इशारा देण्यात आला आहे. (Konkan Rain)
पावसानं आता कुठं वळवला मोर्चा?
कोकणासह मुंबईत (Mumbai weather ) पावसाचा जोर काही अंशी कमी झालेला असतानाच आता हेच मान्सूनचे वारे थेट विदर्भाच्या पूर्वेकडे कूच करत असून, परिणामी येथील जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इथं विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पूर्व विदर्भात प्रामुख्यानं गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवत दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या पश्चिम बंगालपासून बांगलादेशपर्यंतच्या सागरी भागावर समुद्रसपाटीपासून साधारण 9 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत असल्यामुळं कमी दाबाच्या पट्ट्यावर याचे परिणाम होत आहेत.
ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा?
देशभरात सध्या पावसाचीच हजेरी पाहायला मिळत असून, त्याचं प्रमाण मात्र असमान आहे. तिथं (Himachal Pradesh) हिमाचल प्रदेशात पावसानं धडकी भरवली असून, पुढच्या 24 तासांमध्ये कुल्लू, मनाली, शिमला, सोलन, मंडी, चंबा, उना, सिरमौर इथं हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा देत प्रशासनानं नागरिक आणि यंत्रणांना सतर्क केलं आहे. तर (Uttarakhand) उत्तराखंडच्या अल्मोडा, बागेश्वर, नैनीताल, गढवाल, चमोरी या भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील, तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रामुख्यानं किनारपट्टी भागांमध्ये आणि घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे.