डॉ. जयंत नारळीकर हे अतिशय विद्वान शास्त्रज्ञ होते. त्यांनी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत विज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे; ज्यातून अनेक विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक गोडी निर्माण झाली आणि प्रेरणा मिळाली. विज्ञानात फक्त सत्यच
.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेतर्फे प्रख्यात खगोल भौतिक शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक पद्मविभूषण कै. जयंत नारळीकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विज्ञान लेखकांचा सन्मान करण्यात आला. नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सच्या फिरोदिया सभागृहात आयोजित कार्यक्रमात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी, संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन तर डॉ. अविनाश भोंडवे (आरोग्य), डॉ. विनिता आपटे (पर्यावरण), डॉ. के. सी. मोहिते (भौतिकशास्त्र) यांचा कै. जयंत नारळीकर स्मृती विज्ञान लेखन पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. जी. डी. यादव यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक जोशी (अमेरिका) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेचे अध्यक्ष सचिन ईटकर, रवींद्र डोमाळे, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य एस. एन. सपली मंचावर होते. याच कार्यक्रमात डॉ. दीपक शिकारपूर यांच्या ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (२०२५++)’ या ६३व्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक कै. जयंत नारळीकर यांना अर्पण केले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेवर कधीच मात करू शकणार नाही असे सांगून डॉ.जी.डी. यादव पुढे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता ही पूर्णत: मानवाने पुरविलेल्या माहितीवर अवलंबून असल्यामुळे चुकीची माहिती दिल्यास कृत्रिम बुद्धिमत्ता अयोग्य पद्धतीने माहितीचे विश्लेषण देऊ शकते हा मोठा धोका लक्षात घेणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले, विज्ञान क्षेत्रात फक्त कृत्रिम बुद्धिमत्ताच नव्हे तर सगळ्या विज्ञान शाखांचे महत्त्व आहे.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, डॉ. जयंत नारळीकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी विज्ञान लेखकांना पुरस्कार देणे ही संकल्पना कौतुकास्पद आहे.डॉ. नारळीकर यांनी वैज्ञानिक संकल्पना सोप्या शब्दात सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवून त्यांच्यासाठी विज्ञान विषयक दालन खुले करण्याचे महान कार्य केले आहे.