राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी पक्षाने शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. ते येत्या 15 जुलै रोजी जयंत पाटील यांच्याकडून पदभार
.
राष्ट्रवादी काँग्रेसचा गत 10 जून रोजी वर्धापन दिन साजरा झाला होता. त्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. शरद पवारांनी मला अनेक वर्षे संधी दिली. तब्बल 7 वर्षांचा कालावधी दिला. पण आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे. त्यामुळे मी सर्वांसमोर मला मदमुक्त करण्याची विनंती करत आहे. शेवटी हा पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यांनी या प्रकरणी योग्य तो निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतरच राजकीय वर्तुळात ते कोणत्याही वेळी प्रदेशाध्यक्ष पद सोडतील असे मानले जात होते. त्यानुसार आज त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
15 जुलै रोजी शरद पवार गटाची बैठक, शिंदे त्याच दिवशी पदभार सांभाळणार
यासंबंधीच्या माहितीनुसार, जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. ते येत्या 15 जुलै रोजी अर्थात मंगळवारी आपला पदभार स्वीकारतील अशी माहिती आहे. यासंबंधीच्या निर्णयावर पक्षाच्या त्याच दिवशी होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब केला जाईल, असेही या प्रकरणी सांगितले जात आहे.
जयंत पाटील शरद पवारांचे विश्वासू सहकारी
जयंत पाटील सांगलीच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आघाडी सरकारच्या काळात ते ग्रामविकासमंत्री होते. 2008 मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कारभार आला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. त्यावेळी अनेक नेते या पदाच्या शर्यतीत होते. धनंजय मुंडे, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील आदी नेत्यांची नावे या प्रकरणी चर्चेत होती. पण अखेर जयंत पाटील यांची निवड झाली. राज्यात त्यावेळी भाजपची सत्ता होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांच्यासमोर पक्षसंघटनेच्या बांधणीचे मोठे आव्हान उभे होते. पण त्यांनी त्याच ताकदीने पक्षातील तरुण नेत्यांच्या मदतीने पक्षाची मोट बांधली.
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अचानक राजकीय समिकरणे बदलली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आली. पण तत्पूर्वी अजित पवारांनी पक्षात अपयशी बंड केले आणि जयंत पाटील यांना पक्षावरील आपली पकड अधिक घट्ट करण्याची संधी मिळाली. याचवेळी शरद पवारांचे अतिशय विश्वासू नेते म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली होती.
कोण आहेत शशिकांत शिंदे?

शशिकांत शिंदे हे एक माथाडी नेते आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र मुंबई आहे. ते शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. युतीच्या जावळी येथून सदाशिव सपकाळ आमदार झाले. त्यानंतर 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेव्हा जावळीचा गड ताब्यात घेण्यासाठी शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांना तिथे धाडले. त्यानंतर शिंदे यांनी जावळीचा गड यशस्वीपणे सर करून तिथे राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला. तेव्हापासून ते जावळीच्या राजकारण रमले. त्यानंतर कोरेगावच्या आमदार शालिनीताई पाटील यांनी शरद पवारांविरोधात दंड थोपटले होते तेव्हा पवारांनी पुन्हा शिंदे यांना कोरेगावात पाठवून शालिनीताईंचा बंदोबस्त केला.
याच काळात कोरेगावच्या अन्य एका शिंदेंनी (महेश शिंदे) शशिकांत यांना कोरेगावच्या मैदानात अस्मान दाखवले. पण ही बाब दुर्लक्षित करून पवारांनी त्यांना ताकद देण्यासाठी विधान परिषदेवर संधी दिली. त्यामुळे त्यांचे व शरद पवारांचे संबंध अतिशय जवळचे असल्याचे मानले जाते.