आपला प्रभाग हाच आपल्यासाठी निवडणुकीचा किल्ला आहे. तेथील लोकांना भेटा, त्यांच्या अडी-अडचणी समजून घ्या, पक्षाची ताकद तुमच्या पाठीशी आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तिचा वापर करा. अशाप्रकारे जनमत आपल्या बाजूने तयार करण्याची सूचना काँग्रेस पदाधिकाऱ्या
.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात अलिकडेच जिल्हाभरातील मंडळ अध्यक्षांची बैठक पार पडली. यावेळी सदर सूचना करण्यात आली. बैठकीला माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, खासदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, एडीसीसीचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे, सेवादल अध्यक्ष प्रदीपराव देशमुख,जिल्हा संघटक गिरीश कराळे यांच्या प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत स्थानिक स्तरावर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
निवडणुकीत ज्यांची भूमिका महत्वाची असते, अशा सर्व पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. यामध्ये जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, शहर व ग्रामीण भागातील मंडळ अध्यक्ष आदींचा समावेश होता. प्रमुख मार्गदर्शक म्हणून काँग्रेस नेते बबलू देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “निवडणुका फक्त काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून, प्रत्येक कार्यकर्त्याने आपला मंडळ हाच निवडणुकीचा किल्ला समजून कामाला लागले पाहिजे. मंडळ मजबूत तर मत मजबूत.” ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाची विचारधारा लोकशाही व सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारी आहे. ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम मंडळ अध्यक्षांचे आहे. प्रत्येक प्रभाग, वॉर्ड, गाव पातळीवर काँग्रेसचा झेंडा अधिक भक्कमपणे फडकवण्यासाठी आतापासून तयारीला लागणे आवश्यक आहे.
बैठकीच्या कामकाजादरम्यान मंडळनिहाय नियोजन, मतदार यादीतील तपशील, युवकांमध्ये जनजागृती, महिला सहभाग वाढविणे, सोशल मीडियाचा प्रभावी वापर यावरही चर्चा झाली. शेवटी उपस्थित मंडळ अध्यक्षांनी संघटनेच्या आदेशानुसार पुढील कामकाजासाठी सज्ज असल्याची ग्वाही दिली. बैठकीला प्रमोद दाळू, श्रीकांत बोंडे, निशांत जाधव, नामदेव तनपुरे, सहदेव बेलकर, महेंद्र गैलवार, दीपक सवाई, समीर पाटील, प्रवीण सवाई, शरद भेटाळू, राहुल बोडके आदी उपस्थित होते.