Narayan Rane on Uddhav Raj: उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र, मराठी तरुणांसाठी, नोकरीसाठी काय केल? ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला, ताकद दिली, शिवसेना नावावर यांनी उदरनिर्वाह केला आणि आता मराठी भाषेवरुन आनंदोत्सव साजरा करत आहेत अशी टीका नारायण राणेंनी केली आहे. तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसंदर्भात विचारलं असता म्हणाले की, “दोघं सोबत राहून भविष्य असतं तर ते वेगळे झाले नसते. सत्ताधारी पक्षांकडे 235 आहे, हे काय करणार? यांना आता मराठी माणूस आठवला आहे”.
“आतापर्यंत त्यांनी मराठी माणसासाठी काय केलं आहे? मराठी माणसाची मुंबईत फक्त 18 टक्केवारी आहे. 1960 मध्ये 60 टक्के मराठी लोक होते. मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी असं शिवसेना म्हणायची. मग हे मराठी कुठे गेले? उद्धव ठाकरे अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात आले. त्यांनी महाराष्ट्र, मराठी, मराठी तरुणांसाठी, नोकरीसाठी काय केलं?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंना मराठी आणि हिंदुत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीसंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा वैयक्तिक प्रश्न आहे. शेवटी घर, बंधुत्व आहे. कोणी कुठं जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे”.
उद्धव ठाकरे कधीच राज ठाकरेंनी शिवसेनेत यावं असं म्हणत नाहीत, ते नेहमी महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल असं म्हणतात असं सांगण्यात आलं असता ते म्हणाले की, “राज ठाकरेंनी शिवसेनेत यावं असं उद्धव ठाकरे कधीच म्हणणार नाहीत. कारण यांचं अस्तित्व राहणार नाही. राज शिवेसनेत गेले तर तेच प्रमुख होतील आणि उद्धव ठाकरे नगण्य होतील. त्यामुळे ते स्वत:हून बोलवणार नाहीत. माननीय बाळासाहेबांनी 48 वर्षांत जे मिळवलं ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात साफ करुन टाकलं. त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही. खरी शिवसेना आता एकनाथ शिंदेंची आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना बनावट आहे”.