Raj Thackeray On Alliance With Uddhav Thackeray: हिंदीसंदर्भातील शासन आदेश मागे घेत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर 5 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा रद्द झाला आहे. त्यामुळेच आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना पुन्हा एकत्र पाहण्याची संधी गेली असं दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना वाटत असतानाच राज ठाकरेंनी लवकरच दोन्ही ठाकरे एकत्र येतील असं सांगितलं आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये राज यांनी 5 तारखेला दोन्ही सेनांचा एकत्र विजयी मेळावा होईल असं म्हटलं आहे.
राज यांनी केलं सर्वांचं अभिनंदन
“महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले किंवा रद्द करायला त्यांना भाग पाडलं त्यासाठी मी महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेचं अभिनंदन करेल. सर्व बाजूने तो वेढा आला त्यामुळे विषय रद्द झाला. गरज नसताना हा विषय आला आणि नंतर रद्द झाला. मराठी जनांबरोबरच साहित्यिक, मोजके कलावंत, मराठी वर्तमानपत्र, टीव्ही चॅनेलचे पत्रकार आणि संपादकांचे मी आभार मानतो,” असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले.
विषय श्रेय घेण्याचा नाही
पुढे बोलताना, ” हा विषय श्रेय घेण्याचा नाही. सरकारकडून विषय निघाला तेव्हा सर्वात आधी आम्ही विरोध केला. तसं पत्रही आम्ही दिलेलं. तिन्ही पत्रं मी वाचून दाखवलेली. पत्र गेली त्यानंतर वातावरण तापायला लागलं. इतरही सर्व राजकीय सहभागी झाले. उद्धव ठाकरेंची शिवसेना, पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल इतरही राजकीय पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला. पाच तारीख मोर्चाची जाहीर केलेली,” असंही राज यांनी सांगितलं.
हा मोर्चा निघाला असता तर…
“हा मोर्चा निघाला तर न भुतो असा मोर्चा निघाला असता. 70-75 वर्षाच्या लोकांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा कालावधी आठवला असता. मराठी ताकद काय आहे हे राज्य कर्त्यांना कळलं. मराठी माणूस एकत्र आला की काय होतं हे कळलं. परत सरकार असल्या भानगडीत जाणार नाही अशी मी आशा, अपेक्षा बाळगतो,” असं सूचक विधानही राज यांनी केलं. त्याचप्रमाणे, “या गोष्टींची काही आवश्यकता, गरजच नव्हती,” असं म्हणत राज यांनी हा वाद उगाच उकरुन काढल्याचं म्हटलं.
हे स्लो पॉयझनिंग आहे
“दादा भुसे त्यावेळी आले तेव्हा ते म्हणाले माझं ऐकून तर घ्या. मी तेव्हा म्हणालेलो मी तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही. या विषयामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही. हे स्लो पॉयझनिंग आहे. हे हळू हळू एक एक गोष्टी पेरायच्या. या गोष्टी महाराष्ट्रातच कशा येणार. बाकीची कुठली राज्यं ऐकणार नाहीत. हा प्रयत्न त्यांनी करुन पाहिला. तो त्यांच्या अंगाशी आला. त्यातूनच जीआर मागे घेण्यात आले,” असं राज ठाकरे म्हणाले. “परत ही गोष्ट होणार नाही हे सरकारने नक्की लक्षात ठेवावं. असल्या कोणत्याही गोष्टी आमन्य करणार नाही. आताच्या शिक्षणात पाचवी-सहावीपासून हिंदी वगैरे प्रकार होते. हिंदी आणण्याचा का यांचा प्रयत्न आहे मला कळत नाही. हिंदी राष्ट्रभाषा नाही जी इतर राज्यांवर का लादावं?” असा सवाल राज यांनी केला.
उत्तर भारतीयांना मराठी शिकवा…
“उत्तर भारतातील अनेक लोक रोजगारासाठी महाराष्ट्रात येतात. तर त्या भागात मराठी शिकवली पाहिजे. ते न करता. दीड दोनशे वर्षांपूर्वीची एक भाषा हजारो वर्षांपूर्वीच्या भाषेच्या वरचढ होण्यासाठी हे लोक प्रयत्न करायला लावत आहेत. हे मान्य होऊच शकत नाही,” असंही राज यांनी सांगितलं.
दोन्ही सेनांचा एकत्र मेळावा
पुढे बोलताना राज ठाकरेंनी, “शासन आदेश रद्द झाल्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आलेला. आपण काय करायचं पुढे. म्हटलं, मोर्चा तर रद्द करावा लागेल. एक विजयी मेळावा घेऊयात, असं ते म्हणाले. त्यावर मी म्हटलं, घेऊयात! ठिकाणं वगैरे जाहीर करु नका. मी माझ्या काही लोकांची बोलेन, चर्चा करेन. त्यानंतर एकत्र मिळून ठरु आणि बघू पाच तारखेला काय करायचं ते. पाच तारखेला ठिकाण ठरलेलं नाही. मग त्यांच्याशी माझे सहकारी बोलतील. मग तो पाच तारखेचा मेळाव होईल. तो मेळावा झाला तरी त्याला काही पक्षीय लेबल लावण्यात अर्थ नाही. हा विजय मराठी माणसाचा विजय आहे. त्या दृष्टीकोनातून तुम्ही याकडे पहावे,” असा सल्ला प्रसारमाध्यमांना दिला. तसेच हा मेळावा कुठे करणार हे ठरेल तेव्हा तुम्हाला सांगू, असंही राज म्हणाले.