जिल्ह्यातील ३१ हजारांवर रुग्णांना १०३ कोटींचे ‘आयुष्मान’: जिल्हाभरातील ३८ रुग्णालयात सुविधा, गरजूंसह श्रीमंतांनाही लाभ; आयुष्मान भारत योजनेत आता नवे बदल‎ – Amravati News



जिल्ह्यातील ३१ हजार ८७ रुग्णांना आतापर्यंत १०३ कोटी २६ लाख रुपयांची वैद्यकीय सेवा मोफत पुरवण्यात आली आहे. शासनाच्या ‘आयुष्मान भारत’ योजनेमुळे हे शक्य झाले असून, २० शासकीय आणि १८ खासगी अशा ३८ रुग्णालयात रुग्णांवर उपचार केलेत.

.

दरम्यान शासकीय खर्चाने आजार दुरुस्त करणाऱ्या आयुष्मान भारत योजनेत नव्याने बदल करण्यात आले असून, आता या योजनेचा लाभ गरीब-श्रीमंत कुणालाही घेता येतो. पूर्वी फक्त अंत्योदय व प्राधान्य गटाचे रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांनाच या योजनेतून उपचार मिळत होते. शुभ्र शिधापत्रिकाधारक किंवा रेशन कार्ड नसणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोणत्याही उत्पन्न गटाचा व्यक्ती या योजनेतून उपचारांची मागणी करू शकतो. त्यासाठी जिल्ह्यात २० शासकीय आणि १८ खासगी रुग्णालये निर्देशित केली आहेत.

या रुग्णालयांमधून जिल्ह्यातील ३१ हजार ८७ रुग्णांना लाभ मिळाला. याशिवाय चालू आर्थिक वर्षात १० जूनपर्यंत २० कोटी ५४ लाख ९६ हजार ७०० रुपयांचा खर्च झाला आहे. या योजनेद्वारे प्रतिकुटुंब प्रतिवर्ष ५ लाखांपर्यंतची मदत पुरवली जाते. अर्थात एवढ्या रकमेच्या खर्चाचे उपचार केले जातात. हे उपचार त्या कुटुंबातील एक किंवा त्याहून जास्त व्यक्तींना घेता येतात. दुर्धर आजाराच्या शस्त्रक्रियांचाही यात समावेश आहे. देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सुचवल्यानुसार या योजनेत ३४ विशेष शस्त्रक्रियांचा समावेश केला आहे. रुग्ण दाखल झाल्यापासून ते सुटी होईपर्यंतचा सर्व खर्च या योजनेतून केला जातो. ही योजना पूर्णत: कागदरहित असून, ती संगणक प्रणालीद्वारे राबवली जाते. त्यासाठी प्रत्येक अंगीकृत रुग्णालयात आरोग्यमित्र नियुक्त करण्यात आलेत. लाभार्थ्यांना मदत पुरवण्यासाठीही हेच आरोग्यमित्र मदत करतात.

पेट सीटी-स्कॅनही योजनेतूनच पूर्वी कर्करोगाशी संबंधित ‘पेट सीटी-स्कॅन’ ही महागडी चाचणी रुग्णांना स्वखर्चाने करावी लागत होती. ही चाचणी केल्यानंतरच कर्करोगाचे पक्के निदान केले जात होते. तसेच निदान झाल्याशिवाय योजनेतून खर्च सुरू केला जात नव्हता. परंतु आता त्यात बदल करण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर योजनेतील निधीतूनच संबंधितांचे पेट सीटी-स्कॅन केले जाते.

या रुग्णालयांमध्ये मिळतो आयुष्मान योजनेचा लाभ

अमरावतीमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा क्षय रुग्णालय, पीडीएमसी, संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलसह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांत या योजनेचा लाभ दिला जातो. याशिवाय अमरावती, अचलपूर, वरुड, धामणगाव रेल्वे येथील काही नामांकित रुग्णालयांतही आयुष्मान भारत योजनेंतर्गत उपचाराची सोय आहे. अशा नामांकित खासगी रुग्णालयांची एकूण संख्या १८ आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24