Konkan : लोकसभा, विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आता प्रत्येक पक्ष जिवाचं रान करू लागलाय. महायुती आणि महाविकास आघाडी जरी असली तरी जागावाटपाच्या सूत्रावर सर्व गणित अवलंबून असेल. असं असताना त्या आधीच तळकोकणात महायुतीत धुमशान सुरू झालं आहे. आमचा पक्ष मोठा म्हणत शिवसेनेनं भाजपला ललकारलंय तर त्यावर भाजपानंही स्वबळाची भाषा केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात. गावागावांत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षानं कंबर कसली आहे. बैठका, मेळावे सुरू झालेत. या सगळ्यात लक्ष वेधलं जातं आहे ते तळकोकणाकडे. कारण इथे सध्या महायुतीत धुमशान सुरू झालं आहे. अद्याप निवडणुका युती म्हणून लढणार की स्वबळावर हे स्पष्ट झालेलं नाही. जागावाटपालाही अवकाश आहे पण त्याआधीच स्थानिक पातळीवर मात्र जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.
कोकणात आमचीच ताकद, शिवसेनेचा दावा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मेळाव्यात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी सावंतवाडी आणि कुडाळ मतदारसंघात 60 टक्के जागा मिळाव्यात अशी मागणी केली. हीच री ओढत मंत्री उदय सामंत यांनी संघटना इतक्या जोमानं वाढवा की आपल्याला 80 टक्के जागा मिळतील असं म्हटलं आहे. तर निवडणुका युती म्हणूनच लढल्या जातील. मात्र, युती धर्म दोन्हीकडून पाळला जावा असं सांगत आमदार दीपक केसरकर यांनी भाजपाला कोपरखळी मारली आहे. तर कोकणात शिवसेना हाच मोठा पक्ष असं जाहीर करुन मंत्री भरत गोगावले यांनी दंड धोपटले आहेत.
भाजपाचीही स्वबळाची भाषा
शिवसेनेच्या नेत्यांच्या या दाव्यावर भाजपाकडून उत्तर मिळालं नाही तरच नवल. निवडणुकीत दोन्ही आमदार निवडून येण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांची फळी कार्यरत होती असं म्हणत भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी सुनावलं आहे. महायुती म्हणून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गळ्यात गळे घालून काम करणारे युतीचे कार्यकर्ते आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात स्वतःच्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात म्हणून नेत्यांकडे मागणी करत आहेत.
नेते मंडळीही कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या हो ला हो देत आहेत. वरीष्ठ नेत्यांनी महायुती म्हणून लढणार असल्याचं जाहीर केलंय खरं. पण आगामी काळात नेमकं काय घडतं यासाठी थोडी कळ सोसावी लागेल.