राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या वतीने 5 जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. तर चर्चेच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा निघू शकतो, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी के
.
राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या प्रस्तावित निर्णयावरून आता ‘हिंदी विरुद्ध मराठी’ असा वाद चांगलाच पेटला आहे. या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध होत असून, अनेक मराठीभाषिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेने या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 5 जुलैला मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
नेमके काय म्हणाले संदीप देशपांडे?
ज्या पद्धतीने महाराष्टाचे वातावरण तयार झाले आहे. तेव्हा सरकार जागे होऊ लागले आहे. पण खडबडून जागे केल्याशिवाय आम्ही मोर्चा मागे घेणार नाही, असे संदीप देशपांडे म्हणालेत. तसेच मोर्चा मागे घ्यायचा की नाही घ्यायचा, याबाबत सर्व निर्णय राज ठाकरे घेतील, असेही त्यांनी सांगितले. याआधी सरकारने फसवणूक केलेली आहे. म्हणून शासन निर्णय आल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नवीन शैक्षणीय धोरणात म्हटलेले आहे की, तृतीय भाषा घ्यावी की नाही याचा निर्णय राज्य सरकारला आहे. मग राज्य सरकार का घाई करत आहे? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.
मोर्चाला अनेकांचा पाठिंबा
संदीप देशपांडे पुढे म्हणाले, आज नुसतेच राजकीय पक्ष नाही तर भीमसैनिक संघटनेने देखील मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या लोकांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. भाजपच्या मंत्र्यांचे स्टेटमेंट ऐकले तर ते म्हटले आहे की, मी हिंदी बोलणार नाही. अजित दादांचे देखील वक्तव्य बघा. ते विरोधक नाही, तर ते सत्ताधारीच आहेत.
सचिन अहिरांकडून अजित पवारांच्या विधानाचे स्वागत
दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचे स्वागत करताना सरकारवर टीकास्त्र सोडले. चला, किमान एक गोष्ट तरी त्यांनी मान्य केली की आमचा मुद्दा रास्त आहे. दादा परखड बोलले, त्याचे स्वागत करायला हवे. पण सरकार बोलते एक आणि करते एक, हे लोकांनी पाहिले आहे, अशी टीका अहिर यांनी केली.
ते पुढे म्हणाले, एक उपमुख्यमंत्री बोलत आहे आणि दुसरे शांत आहे. त्यांचे जे लोक आहे ते मूळ विषयावरून बगल देण्याचे काम करत आहे. जीआर त्यांनी काढला, आम्ही काढला नाही . सबकमिटीचा अहवाल स्वीकारला, पण आम्ही कॅबिनेटमध्ये कुठे त्याचा जीआर काढला? हा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी काढला आहे. मला वाटते तो जीआर रद्द केला पाहि जीआर रद्द केला पाहिजे, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली.
हे ही वाचा…
हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न:चर्चेतून मार्ग शोधू, आज कॅबिनेटमध्ये चर्चा करु- अजित पवार
हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे.चर्चेतून चांगला मार्ग निघू शकतो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तर आज आमची कॅबिनेट आहे त्यामध्ये आम्ही या विषयावर चर्चा करु, असे अजित पवारांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…