5th Jully Morcha In Mumbai: इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट सरकारला आव्हान देत 5 जुलै रोजी संयुक्त मोर्चाची घोषणा दिली आहे. मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढला जाणार आहे. 5 तारखेला सकाळी 10 वजता होणाऱ्या या मोर्चामध्ये सर्व पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरेंनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलं. या आवाहनाला राज्यसभेचे खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला असून ठाकरे बंधुंनी मराठीसाठी एकत्र येत मोर्चा काढण्याच्या निर्णयाला पवारांच्या पक्षाने बिनशर्त पाठिंबा दिला आहे. तसे पत्रच पक्षाने जारी केलं आहे.
प्रत्येक मराठी माणसाने या मोर्चात…
शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन 5 जुलैच्या मोर्चाला पक्षाचं समर्थन असल्याचं पत्र शेअर करत ही माहिती दिली. “राज्य सरकार महाराष्ट्रात जी हिंदी सक्ती लादू इच्छित आहे त्याविरोधात दिनांक 5 जुलै 2025 रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक मराठी माणसाने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मी करत आहे,” असं हे पत्र शेअर करताना जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी…
“कुणाचाही विविध भाषा शिकण्याला किंबहुना हिंदी भाषेलाही विरोध नाही. पण इयत्ता पहिलीपासूनचं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं असा आग्रह आहे. जो योग्य आहे आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्ष म्हणून आमचीही हीच भूमिका आहे. शैक्षणिक धोरणाच्या त्रिभाषा सूत्राआडून मातृभाषेला डावलण्यासाठी प्रयत्न होत असतील तर मराठी माणूस एकदिलाने त्याचा विरोध करणार.
महाराष्ट्र हिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे,” असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
एकत्र बॅनर
दरम्यान, दुसरीकडे शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांनी राज आणि उद्धव यांच्यासोबत पक्षाचे प्रमुख नेते शरद पवारांचा फोटो असलेले बॅनर झळकावत 5 जुलैच्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. ठाण्यात हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राचं या मोर्चाकडे लक्ष
राज आणि उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये एकत्र दिसतील असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच या मोर्चाकडे केवळ मुंबईकर किंवा पालकांचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. सोमवारपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्येही हिंदी सक्तीचा विषय गाजण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.