संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता सातारा जिल्ह्यातील लोणंद–तरडगाव दरम्यानच्या चांदोबाचा लिंब या पारंपरिक ठिकाणी मोठ्या भक्तिभावात पार पडले. चोपदारांनी आकाशाकडे चोप दाखवताच संपूर्ण वार
.
वारकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने तयार केलेल्या शिस्तबद्ध रांगांमध्ये, दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो वैष्णवांच्या उपस्थितीत रिंगण पार पडले. कोणतीही सूचना न देता, गर्दीतील वारकऱ्यांनी आपल्या जागा समजून घेत स्थान मोकळे केले. रथाच्या पुढील २७ दिंड्यांमधून माऊलींचा अश्व पुजाऱ्यांनी दौडत आणला आणि पादुकांचे दर्शन घेऊन मागील दिंड्यांपर्यंत नेला. त्यानंतर पुन्हा माघारी पळत येत अश्वाने दुसऱ्यांदा दौड घेतली. अश्वाच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांमध्ये झुंबड उडाली. रथाजवळ आलेल्या अश्वाचे पुष्पहार व नैवेद्याने स्वागत करण्यात आले.
या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात हरिनामाचा निनाद घुमत होता. फुगड्या, टाळ-मृदंग आणि अभंगवाचनाने संपूर्ण रिंगण रंगून गेले. “विठ्ठल…विठ्ठल…” आणि “माऊली…माऊली…” अशा जयघोषांनी आसमंत दुमदुमून गेला.
दरम्यान, ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लोणंद येथे दीड दिवसाच्या मुक्कामानंतर शुक्रवारी दुपारी १ वाजता पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला. फलटण तालुक्यातील कापडगाव सरहद्दीवर तालुक्याच्या वतीने स्वागत करण्यात आले. फलटण तालुक्यात प्रवेश होताच भाविकांना पहिल्या उभ्या रिंगणाची उत्सुकता लागली होती. त्यामुळे चांदोबाचा लिंब येथे पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या शेतांमध्ये ठिकठिकाणी भारूडांची रंगत होती. “घर तुटकेसे छप्पर, देवाला देवघर नाही, मला दादला नको गं बाई” या संत एकनाथांच्या भारूडाने वारकरी भारावून गेले होते. रस्ता, परिसर आणि आकाश साऱ्याच ठिकाणी भक्तिरस भरून राहिला होता. रिंगण संपल्यानंतर माऊलींची पालखी तरडगाव येथील मुक्कामस्थळी स्थिरावली.
विशेष म्हणजे, दरवर्षी पारंपरिक स्थळी होणारे रिंगण यंदा काही कारणास्तव जवळपास ५०० ते ६०० मीटर पूर्वेकडे हलवण्यात आले. त्यामुळे सुरुवातीला थोडी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, मात्र पालखीतील शिस्तबद्धतेमुळे क्षणात वातावरण पूर्वपदावर आले आणि रिंगण अत्यंत उत्साहात पार पडले.
हे ही वाचा…
काटेवाडीत संत तुकारामांच्या पालखीचे धोतराच्या पायघड्यांनी पालखीचे स्वागत, डोळ्यांचे पारणे फेडणारा मेंढ्यांचा रिंगण सोहळा
संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा साताऱ्यातून बारामतीतील काटेवाडीमध्ये शुक्रवारी पोहोचला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा एक अनोखा आणि लक्षवेधी क्षण काटेवाडीत अनुभवायला मिळाला. तुकोबांच्या पालखीच्या स्वागतासाठी काटेवाडी ग्रामस्थांकडून धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या. त्यानंतर डोळ्यांचे पारणे फेडणारा मेंढ्यांचा रिंगण सोहळा पार पडला. पूर्ण बातमी वाचा…