संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा साताऱ्यातून बारामतीतील काटेवाडीमध्ये शुक्रवारी पोहोचला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा एक अनोखा आणि लक्षवेधी क्षण काटेवाडीत अनुभवायला मिळाला. तुकोबांच्या पालखीच्या स्वागतासाठी काटेवाडी ग्रामस्थांकडून धोतराच्या प
.
रिंगण सोहळ्याच्या सुरुवातीला पालखीभोवती मेंढ्या धावल्या. त्यांच्यापाठोपाठ पताकावाले, तुळशी वृंदावनसह कलश डोईवर घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी, पखवाजवाले आणि टाळकरी धावले. रिंगणाच्या पाच फेऱ्या पूर्ण होईपर्यंत तुकोबा आणि माऊलीचा नामघोष सुरू होता.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण काठेवाडी गावात सजावट करण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थांकडून दारोदारी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या पालखी सोहळ्यात धोतराच्या पायघड्यांना विशेष महत्त्व असते. सुमारे 140 वर्षांपासून धोतराच्या पायघड्यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत केले जाते.

रिंगण सोहळ्यानंतर पालखीचे सणसरकडे प्रस्थान
दरवर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे काटेवाडीत आगमन झाल्यावर पालखीला मेंढ्यांचे रिंगण घातले जाते. हा रिंगण सोहळा पाहायला वारकरी प्रचंड गर्दी करतात. काटेवाडीतील मेंढ्यांचे रिंगण हे संत तुकाराम महाराज यांच्या वारीतले किंवा पालखी सोहळ्यातील अनोखे वैशिष्ट्य म्हणता येईल. कारण संपूर्ण पालखी मार्गावरील या एकाच ठिकाणी मेंढ्या रिंगण सोहळ्यात सहभागी होतात. आजचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी देखील वारकरी मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. रिंगण सोहळ्यानंतर पालखीने इंदापूर तालुक्यातील सणसर मुक्कामी प्रस्थान केले.
पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी
पालखी सोहळा सुरळीत पार पडावा, यासाठी स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाने काम केले. या ठिकाणी पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि रिंगण स्थळावर मंडप उभारणी करण्यात आलेली आहे. परिसरातील विहिरींचे शुद्धीकरण आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्यविषयक उपाययोजनाही केल्या आहेत.
आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठलाचे आजपासून 24 तास दर्शन
दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, यात्रा कालावधीत चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षी 27 जून रोजी विधिवत पुजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड; तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे 24 तास मुखदर्शन, तर 22.15 तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
दरम्यान, श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. 16 जुलै (प्रक्षाळपुजा) पर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे. श्रींचा पलंग काढताना पुजेवेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतलाताई नडगिरे, ॲड. माधवीताई निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, विभाग प्रमुख संजय कोकीळ, अतुल बक्षी व पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.
हे ही वाचा…
आषाढी वारी:ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे नीरा नदीतील पहिले पादुका स्नान; तर सातारा जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात स्वागत
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाला. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबतच्या पादुकाचे नीरा नदीतील पहिले पादुका स्नान देखील आज संपन्न झाले. पूर्ण बातमी वाचा…