ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई : उद्धव ठाकरेंचे कोकणातील महत्त्वाचे शिलेदार भास्कर जाधव हे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याचं दिसून येतंय. झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली होती.. मात्र, पुन्हा एकदा यांनी ठेवलेल्या व्हॉट्स ऍप स्टेटसवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
उद्धव ठाकरेंचे फायर ब्रँड नेते भास्कर जाधवांची नाराजी अजूनही दूर झालेली नाही आहे. कारण पुन्हा एकदा भास्कर जाधवांनी ते नाराज असल्याचे संकेत दिले आहेत. भास्कर जाधवांनी ठेवलेल्या व्हॉट्स स्टेटसवरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. काही दिवसांपूर्वी
भास्कर जाधवांनी टू ट पॉईंट मुलाखतीमधून आपली पक्षावर नाराजी व्यक्त केली होती
भास्कर जाधव यांची नाराजी
सब साथ है, फिर भी एक खालीपन सा है.
रिश्तों में आज कल दिखावे का अपनापन
सा है.
दीपक को घी तब चाहिए जब वो जल
रहा हो बुझने के बाद घी डालना व्यर्थ है.
उसी प्रकार इंसान की कद्र समय रहते कर
लिजिये वक्त जाने पर अफसोस करना व्यर्थ है.
भास्कर जाधवांच्या नाराजीनाम्याचे स्टेटसची चर्चा मातोश्रीवरही पोहचली. मातोश्रीनं भास्कर जाधवांना तातडीनं मुंबईला बोलावून घेतलं. भास्कर जाधव तातडीनं मुंबईला रवानाही झाले. दुसरीकडं संजय राऊतांनीही भास्कर जाधवांना चुचकारलं आहे. भास्कर जाधवांच्या कौतुकाचे दोहेही संजय राऊतांनी गायलं आहे. हे कमी की काय सुनील राऊतांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून आम्ही रुसून बसलो नाही असं सांगत राऊत भास्कर जाधवांचे समदुःखी झाले.
दुसरीकडं शरद पवारांनीही भास्कर जाधवांच्या नाराजीवर भाष्य केलं आहे. भास्कर जाधव नाराज असले तरी शिवसेनेची साथ सोडणार नाहीत असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. भास्कर जाधवांच्या नाराजीच्या जखमेवर फक्त विरोधीपक्षनेतेपदाचं मलम कामी येईल असं वाटतंय. आता मातोश्री त्यांची नाराजी दूर करण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद देते की आणखी कोणत्या आश्वासनावर बोलवण होते हे पाहावं लागणार आहे.