नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर ते सावनेर, जामगाव दरम्यानचा रस्ता अतिशय खराब अवस्थेत पोहोचला आहे. या रस्त्यावरुन ये-जा करणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी या भागाचे आमदार प्रताप अडसड यांना साकडे घातले असून हा रस्ता त्वरेने
.
रस्ता खराब असल्यामुळे नागरिकांना रोजच्या जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण फार पूर्वी करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याची कोणतीही देखभाल अथवा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी सध्यस्थितीत हा रस्ता पूर्णपणे उखडलेला असून त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. माहुली चोर हे गाव नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एक प्रमुख गाव मानले जाते. हे गाव अमरावती-यवतमाळ मुख्य मार्गालगत असून येथे आठवडी बाजार, दवाखाने, औषधीची दुकाने, रोजच्या व्यवहारातील तसेच जीवनावश्यक वस्तूंची प्रतिष्ठाने आहेत. त्यामुळे आसपासच्या खेड्यांतील नागरिकांची येथे सातत्याने ये-जा सुरु असते. त्यामध्ये सावनेर व जामगाव या गावांतील नागरिकांची संख्या सर्वाधिक असून या दोन्ही गावांना माहुली चोरशी जोडणारा हा प्रमुख संपर्क मार्ग आहे.सध्या या रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट झाली असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्याच्या तोंडावर ही स्थिती अधिकच बिकट झाली आहे. परिणामी अपघाताचा धोका वाढला असून रुग्णवाहिका आणि शालेय वाहनांनाही या मार्गाने येणे-जाणे कठीण झाले आहे.
या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी येथील नागरिक अंकुश कोल्हे, अंकुश खांडेकर, आकाश अंबर्ते, चेतन दाते यांनी आमदार प्रताप अडसड यांना निवेदन दिले असून रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. रस्त्याची डागडूजी त्वरेने न झाल्यास भविष्यात काय नुकसान होऊ शकते, नागरिकांना कशा मरणयातना भोगाव्या लागू शकतात, याचा अंदाजही त्यांच्या पुढे व्यक्त करण्यात आला. त्यामुळेच या मागणीची तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
विकास फक्त घोषणांपुरता का?गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. विकासाच्या गप्पा खूप होतात, पण आम्हाला रोजचा रस्ता द्या,’ अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.