Maharashtra Weather Update: मुंबईसह राज्यात इतर ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचं बघायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने राज्याला पुढील चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात कसं असेल वातावरण? जाणून घेऊयात.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा आणि कोकण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला देखील मुसळधार पाऊस पडलाय. तसेच इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरु असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस पुणे, मुंबई, सातारा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.
मुंबईत मोठ्या भरतीचा इशारा
पुढील चार ते पाच दिवस समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, या काळात 19 वेळा समुद्राला मोठी भरती येणार आहे. भरतीच्या वेळी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. सर्वाधिक उंचीच्या लाटा या 26 जून रोजी उसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच समुद्र किनाऱ्याजवळ जाऊ नये अशा सूचना देखील मुंबई महानगरपालिकेने दिल्या आहेत. पालिकेने दिलेल्या सूचनाचे पालन करावे असं आवाहन महानगरपालिकेने नागरिकांना केलं आहे.
कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसात कोकणात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यावेळी कोकण आणि मध्य घाट भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर इतर भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना आपल्यासोबत रेनकोट किंवा छत्री जवळ ठेवावी. त्यासोबत विनाकारण बाहेर पडू नये.
‘या’ 4 जिल्ह्यांवर महापुराचं संकट
कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाने रौद्र रुप धारण केलं आहे. ज्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.