Wardha: महात्मा गांधींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यातली दारुबंदी हटवण्याच्या मागणीवरुन खासदार अमर काळेंनी घूमजाव केलंय. वर्ध्यात बेकायदेशीर सुरु असलेल्या दारुविक्रीबाबत बोलताना आपण उपरोधिक वक्तव्य केल्याचा दावा आता अमर काळेंनी केलाय. दारुबंदी हटवण्याच्या मागणीचं बुमरँग झाल्यावर त्यांनी हा पवित्रा घेतल्याची चर्चा वर्ध्यात सुरु झालीये.
राजकीय नेते जे बोलतात त्याचा अर्थ तसाच्या तसा घेतलं म्हणजे थोडं अवघड होऊन जातं. वर्ध्यांचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी वर्ध्यातली दारुबंदी उठवण्याची मागणी केली. एवढंच नाही तर त्यांनी विनोबा भावेंचा पवनार आश्रम आणि महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाचा परिसर दारुबंदीतून वगळण्याची मागणी केली.
दारुबंदी हटवण्य़ाची अमर काळेंनी केलेली मागणीचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर खासदार महोदयांनी 360अंश कोनातून घूमजाव केलं.दारुबंदी हटवण्याबाबत केलेलं ते वक्तव्य नैराश्यातून आणि उपरोधित असल्याचा दावा खासदार अमर काळेंनी केलाय. वर्ध्यात दारुबंदी कठोरपणे राबवली जात नाही त्यामुळं असं वक्तव्य केल्याचं अमर काळेंचं म्हणणं आहे.
चंद्रपुरातील दारुबंदी हटवण्यासाठी अशीच राजकीय मोहीम चालवण्यात आली. चंद्रपुरातील त्या मोहिमेमुळं कुणाचंतरी कोटकल्याण झालं होतं. दारुबंदीमुळं महसूल बुडतोय वैगेरे हे तोटे सांगण्याऐवजी दारुबंदीचे फायदेही कधीतरी खासदारांनी सांगितले असते तर बरं झालं असतं. 24 तासांआधी जे खासदार महोदय दारुबंदी उठवण्याची आग्रही भूमिका मांडत होते. त्यांचं 24 तासानंतर मतपरिवर्तन झालं हा गांधीबाबांच्या विचारांचा प्रभाव तर नाही ना?.
खेडमधील जिल्हा परिषदेच्या शाळेचा जगात डंका
आताच्या काळात चांगलं शिक्षण म्हंटल की इंग्रजी शाळा, सीबीएसई शाळेकडेच पाहिलं जातं. पण खेडच्या कन्हेरसर येथील जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद शाळेने जगात आपला डंका वाजवलाय. आपले विविध उपक्रम, आंतराष्ट्रीय दर्जांचे शिक्षण, प्रशिक्षण यामुळे शाळेने जगातील टॉप टेनमध्ये स्थान पटकावलं.शाळेची ही किमया काय आहे? मग्न होऊन विविध उपक्रम करणारी मुलं, हसत खेळत अभ्यासाचे धडे गिरवणारे, योगा आणि संगीताची साथीने अभ्यासाची गोडी निर्माण करणारे शिक्षक. हे वातावरण एका जिल्हा परिषद शाळेतली आहे, असे सांगून कोणाला विश्वास बसणार नाही. पण खेडच्या जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेने आपल्या याच वेगळेपणाने जगात आपली ओळख निर्माण केलीये.ही शाळा T4 या आंतरराष्ट्रीय एज्युकेशन संस्थेने आयोजीत केलेल्या जागतिक स्पर्धेत टॉप टेन मध्ये आली आहे. ही एकमेव सरकारी जिल्हा परिषदेची शाळा यात सहभागी झाली होती.आणि या शाळेने आपल्या वैशिष्ट्याने आपलं वेगळेपण दाखवून दिलं. फक्त शिक्षणच नाही तर इथे अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. मुलांच्या कल्पना, त्यांच्या विचाराला शाळा वाव देते. वेगवेगळ्या प्रयोगांची आणि शिक्षणाच्या नव्या वाटांची ही शाळा आहे. मुलांना या शाळेत कसलीच भीती दबाव जाणवत नाही.रागात, ओरडणारे शिक्षक नसल्याने मुलांना मुक्त व्यासपीठ मिळतंय.