गावच्या राजकारणामुळे विकास रखडला, कंटाळलेल्या सरपंच महिलेचे अजित दादांना भावनिक पत्र


महेंद्रकुमार मुधोळकर, झी 24 तास बीड: जनतेतून निवडून आल्यानंतर गावाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. मात्र जनतेतून निवडून येऊन देखील विरोधक ठरावावर स्वाक्षरी करत नाहीत. परिणामी गेल्या अडीच वर्षापासून गावचा विकास रखडला आहे. अखेर संतप्त झालेल्या सरपंच महिलेने पालकमंत्री अजित पवार यांनाच भावनिक पत्र लिहून सरपंच पदावरून पायउतार होण्याचा सल्ला मागितला आहे. हा प्रकार बीडच्या पाली गावचा असून त्या पत्राची राज्यभर चर्चा होत आहे.

बारावी पास असलेल्या मंजुषा यांच्यावर पाली गावच्या सरपंच पदाची धुरा आहे. बीडच्या पाली गावात 2022 साली ग्रामपंचायत निवडणूक झाली. अन् पहिल्यांदाच सरपंच हा जनतेतून निवडून द्यायचे निर्देश आले. ग्रामस्थांनी मंजुषा नवले यांना निवडणूक लढण्यास आग्रह केला. आणि त्या भरघोस मतांनी विजयी देखील झाल्या. निवडणुका जिंकून महिना गेला. त्यानंतर मात्र राजकारणी विरोधकांचा खरा चेहरा समोर आला. गेल्या अडीच वर्षापासून मंजुषा यांनी तयार केलेल्या विकास आराखड्यावर एकही सदस्याने स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे गावात कसलाही विकास झालाच नाही. अखेर हतबल झालेल्या सरपंच मंजुषा यांनी थेट बीडचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनाच पत्र लिहून सरपंच पदावरून पायउतार होण्याचा सल्ला मागितला आहे.

पाली गावाची लोकसंख्या चार हजाराहून अधिक आहे. राष्ट्रीय महामार्ग गावाच्या मधून गेलाय. मात्र गावात कवडीचेही विकास काम झाले नाही. गावाशेजारीच बिंदुसरा धरण आहे. या धरणातून बीडसह 18 गावाला पाणीपुरवठा होतो. मात्र स्थानिक राजकारणामुळे गावात पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी आहे. विरोधक काम करूच देत नाहीत असा आरोप ग्रामस्थ देखील करत आहेत.

शिक्षित महिला सरपंच म्हणून गावकऱ्यांनीच निवडून दिले. गावाचा कायापालट होईल असे ग्रामस्थांना वाटले होते. मात्र विरोधकांनीच श्रेय कोणाला नको म्हणून विकास कामात खोडा घातला. आज गावात एकही नाली नाही, रस्त्याची देखील अवस्था बिकट आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विरोधकांनी गुण्यागोविंदाने राहून विकासाचे रथ जोमाने पुढे न्यायला पाहिजे होते. मात्र निव्वळ महिला सरपंच असल्याने विरोधक मुळावर उठल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय..

सरपंच महिलेने पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिल्यानंतर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. महिला सरपंचाच्या बाजूने आता उद्धव ठाकरे गटाने देखील यात उडी घेतली आहे. अजित पवार यांनी बारामतीचा जसा विकास केला तसाच विकास बीडचा देखील पाहिजे. महिला सरपंचाने लिहिलेल्या पत्रावर अजित पवारांनी गांभीर्याने घ्यावे अन्यथा अजित पवारांनी बीडच्या पालकमंत्री पदावरून पायउतार व्हावे असे मिश्किल वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी केले आहे

महिलांना समान हक्क कायदा मंजूर झाला असला तरी बीड मध्ये मात्र या कायद्याची पायमल्ली झालिये. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी सोबत रहावे असे वल्गना करणारे बीडचे राजकारणी आणि नेते मात्र या घटनेकडे पाहून मुग गिळून गप्प आहेत. आता बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार नेमकी काय भूमिका घेतील..? किंवा मंजुषा नवले या महिला सरपंचाला काय सल्ला देतील याकडे लक्ष लागले आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24