महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जेव्हा पावसाची गरज असते तेव्हा अनेकदा तो दडी मारून बसतो तर कधी इतका बरसतो की त्यात पिकही वाहून जातात. यामुळे अनेकवेळा शेतकरी वैतागलेला
.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शेतकरी महिलेने कापसाच्या पिकाला उद्देशून म्हणते, “हे बघ तुझ्यासाठी आम्ही काही पण करायला तयार आहेत. तुला भूक लागली तर तुला खत घालून देतो, तुला तहान लागली तर पाणी सोडतो, तुला सर्दी-खोकला झाला तर तुला औषध फवारणी करू. पण, तू यावर्षी आम्हाला धोका द्यायचा नाही. कमीतकमी एकरी 20 क्विंटल निघालंच पाहिजे. एकतर तुला शेतकरी लई वैतागला आहे. यावर्षी जर तू धोका दिला तर पुढच्या वर्षी तुझा नायनाटच आहे”, असा संवाद कापसाच्या पिकाशी ही शेतकरी महिला साधते.
खरीपात शेतकरी मोठ्या आशेने कापसाचे पीक घेतात. पण बेभरवश्याचा पाऊस, निकृष्ट दर्जाची बियाणे, महागडी खतं-फवारणी, मजुरांचा प्रश्न या सगळ्यातून चार महिने काढून शेवटी मनासारखे एकरी उत्पादन होईलच, याची गॅरंटी नसते; पुन्हा हमीभावाचा प्रश्न आहेच. पण तरीही कोरडवाहू शेतकरी आशावादी असतो.
वैतागलेल्या शेतकऱ्याची एकंदरीत मनःस्थिती या शेतकरी महिलेच्या व्हिडिओमधून समोर आली आहे. या तरुण शेतकरी महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळाली नाही. परंतु शेतकरी महिलेच्या संवादाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.