Ramdas Kadam on Bhaskar Jadhav: रामदास कदम यांनी 2009 मध्ये माझ्याविरोधात निवडणूक जिंकण्यासाठी अघोरी पूजा केल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी झी 24 तासच्या ‘टू द पॉईंट’ मुलाखतीत केला आहे. यानंतर रामदास कदम यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं असून, त्यांच्याच घरातील महिला काळी विद्या करत असल्याचा दावा केला आहे. तसंच आपणच भास्कर जाधवांना तिकीट देण्यास सांगितलं होतं असा दावा करताना, त्यांचा साप म्हणून उल्लेख केला.
भास्कर जाधव काय म्हणाले होते?
“2009 साली रामदास कदम माझ्याविरोधात उभे होते. ते मध्यंतरी रडत होते, म्हणून मी त्यांना झंडू बाम नाव ठेवलं होतं. गुहागरमध्ये ते ज्या ठिकाणी थांबले होते, ते माझ्या नातेवाईकाचं घऱ होतं. त्यांनी मला रामदास कदम यांच्याकडे कोणीतरी बाबा येत असून, रात्रभर थांबून नंतर परत सकाळी येत असल्याचं सांगितलं. माझ्या नातेवाईकाचं घर असल्याने मी तिथे गेलो तर होम हवन, बाबा होते. पण मीच निवडून आलो. माझ्या घराच्या बाहेर लिंब, टाचण्या लावलेल्या होत्या. आमचा वॉचमन धावत आला. मी त्याला म्हटलं सरबत करुन पिऊ. आईने मला असं काही करु नको सांगितलं,” असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.
रामदास कदमांचं प्रत्युत्तर
“भास्कर जाधव हे स्वत:च्या प्रसिद्धीसाठी, उद्धव ठाकरेंना खूश कऱण्यासाठी खोटं बोलत आहेत. 2009 मध्ये झालेली निवडणूक, त्याला 14 वर्ष झाली. त्यांना अचानक काल साक्षात्कार झाला. मी जिथे थांबलो होतो ते माझ्या नातेवाईकाचं घर होतं. समोरचा उमेदवार घरी येऊ शकतो का? आले होते तर पोलिसांना का बोलवलं नाही? कायद्याचा आधार का घेतला नाही? ते अशिक्षित आहेत का? याचं उत्तर देणार का. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि माझी बदनामी कऱण्यासाठी हा प्रयत्न सुरु आहे. एक तर बाप दाखवा किंवा श्राद्ध घाला. हे धादांत खोटं असून, यात तिळमात्र सत्यता नाही,” असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
उलट भास्कर जाधवच काळी विद्या करत आहेत असा आरोपही त्यांनी केला. “आमच्या खेडमधील खेड घेरापालगड एक भाग आहे, तिथे एक विष्णू भगत होता. भास्कर जाधवांच्या घरातील एक महिला खेडच्या काँग्रेसच्या अध्यक्षाला सोबत घेऊन, गोणीत लिंब, नारळ घेऊन त्याच्या ठिकाणी जाऊन माझ्याविरोधात तांत्रिक विद्या करत होत्या. माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. विष्णू भगत आता या जगात नाही. पण त्याचा भाऊ, तो काँग्रेसचा अध्यक्ष यांना मीडियासमोर उभा करेन. मी महिलेचं नाव घेत नाही, कारण ती संस्कृती नाही. पण ती भास्कर जाधव यांच्या कुटुंबातील आहे. कोकणात नारायण राणे, मला बदनाम कऱण्यासाठी त्यांनी हा एलकलमी कार्यक्रम आखला आहे अशी मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो”, असं ते म्हणाले आहेत.
“2009 मध्ये मी निवडणुकीला उभा असताना, मला भास्कर जाधव नाही तर उद्धव ठाकरेंनी पाडलं. शिवसेनेच्या एका नेत्याला सुपारी दिली होती. आमचे नातूसाहेब यांना उभे केलं की राहिले ते माहिती नाही. बाळासाहेबांना त्यांना थांबा, तुम्हाला शिवसेनेच्या कोट्यातून एक विधानपरिषद देतो असं आश्वासन दिलं होतं. 2009 मध्ये विरोधी पक्षनेता होतो. कदाचित बाळासाहेब मला मुख्यमंत्री करतील अशी भीती उद्धव ठाकरेंना होती. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. म्हणून अनंत गीतेला सांगून कुणबी समाजाला माझ्या विरोधात मतदान करायला लावून मला पाडलं हे वास्तव आहे,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
“भास्कर जाधवांची मला पाडायची काय औकाद आहे. मीच त्यांना तिकीट द्यायला लावलं. मी मोठी मदत केली, पण ते साप आहेत. किती दूध पाजलं तरी विष ओकतात,” अशी टीका त्यांनी केली.