Uddhav Thackeray Shivsena Slams CM: “मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी दिल्लीत नरेंदरभाई आणि महाराष्ट्रात देवेंदरभाऊ शर्थीचे प्रयत्न करीत असतात. त्यामुळे त्यांना पदोपदी खोटे बोलावे लागते. निवडणुकीपूर्वी दिलेल्या सर्व आश्वासनांना हरताळ फासून फडणवीस व त्यांचे लोक सत्तेवर बसले आहेत. फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनी वारकऱ्यांसोबत प्राणायाम केला. त्यांचे म्हणणे असे की, “योग ही आपली परंपरा, संस्कृती, आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्याची त्यात असाधारण क्षमता आहे.’’ फडणवीस यांनी ही नेहमीप्रमाणेच बोलबच्चनगिरी केली आहे. सर्व समस्यांवर आणि रोगांवर त्यांनी ‘योग’ हाच उपचार असल्याचे सांगितले. अर्थात, राज्यकर्त्यांच्या खोटारडेपणावर, फसवाफसवीवर ‘योग’ हा उपचार आहे काय, तर तसे दिसत नाही. कारण मुख्यमंत्री रोज उठून एक नवे ‘खोटे’ जनतेशी बोलत आहेत,” असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
कर्जमाफी योग्य वेळ राजकीय सोय पाहून येईल
“‘राज्य’ आल्यावर लगेच कर्जमाफी करू असे वचन फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते, त्याचे काय झाले, असा प्रश्न पत्रकारांनी योगधारणा संपल्यावर फडणवीसांना केला तेव्हा प्राणायामाचा दीर्घ श्वास घेऊन फडणवीस म्हणाले, ‘‘योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेणार. एकही शब्द सरकार फिरवणार नाही.’’ फडणवीस यांचे हे विधान म्हणजे बोलबच्चनगिरीचा कळस आहे,” असा टोला ‘सामना’मधून लगावण्यात आला आहे. “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योग्य वेळ कधी येणार? फडणवीसांचे राज्य अवतरल्यापासून राज्यात पाच हजारांवर शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्येचा आकडा पूर्ण एक लाख झाल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे काय? पुन्हा तिकडे फडणवीसांचे सरकारी खजिनदार अजित पवार ठामपणे सांगतात, ‘‘कर्जमाफीचे नावच काढू नका. मी काही कर्जमाफीचे आश्वासन कधी दिले नव्हते. सगळी सोंगे करता येतात, पण पैशाचे सोंग करता येत नाही.’’ शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी फेडावेत अशा सूचनाही दिल्या. फडणवीस मात्र योग्यवेळी आम्ही पैशाचेही सोंग आणू व कर्जमाफी करू, असे सांगत आहेत. कदाचित ही योग्य वेळ राजकीय सोय पाहून येईल,” असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
आंतरराष्ट्रीय योगदिनीच मोदींचे मित्र ट्रम्प यांनी इराणवर बॉम्बहल्ला केला
“पुढील लोकसभा-विधानसभा निवडणुकांआधी साधारण दोन महिने शेतकऱ्यांना लाडक्या बहिणींप्रमाणे जाळ्यात ओढले जाईल हे नक्की. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा वादा सत्तेतील लाडक्या भावांनी केला होता, पण लाडक्या बहिणींची भरघोस मते मिळाल्यावर 2100 सोडा, पण मूळचे 1500 देतानाही मारामार झाली आहे. आता हे 2100 देण्याचा मुहूर्तही निवडणुकांच्या आधीच काढला जाईल. मुख्यमंत्री व त्यांचे लोक रोज खोटे बोलत आहेत व आंतरराष्ट्रीय योगदिनीही त्यांनी खोटेपणाच्याच चिपळ्या वाजवल्या. पंतप्रधान मोदी यांनी आंध्र प्रदेशात जाऊन ‘योग’ प्रदर्शन केले. प्राणायाम झाल्यावर ते म्हणाले, ‘‘जग सध्या तणाव, अशांती आणि अस्थिरतेतून जात आहे. अनेक क्षेत्रांत हीच स्थिती आहे. अशा वेळी योग आपल्याला शांततेचा मार्ग दाखवतो.’’ मोदीजींनी संदेश तर चांगलाच दिला. खास करून शांततेचा, पण आंतरराष्ट्रीय योगदिनीच मोदींचे मित्र ट्रम्प यांनी इराणवर बॉम्बहल्ला केला आहे. खुद्द आपल्या भारतात मणिपूर ते कश्मीरपर्यंत हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे व पंतप्रधान मोदी मणिपुरात जाऊन शांतता प्रस्थापित करतील हा ‘योग’ काही येत नाही,” असा खोचक टोला लेखातून लगावण्यात आला आहे.
सत्ता भोगण्याचा डाव काही संपत नाही
“महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनातील तणाव आणि अस्थिरतेवर पंतप्रधान मोदींकडे काय उपाय आहे? की फक्त बोलबच्चनगिरी करून वेळ मारून न्यायची हेच त्यांचे धोरण आहे. पुण्यात फडणवीस यांनी वारकऱ्यांसोबत प्राणायाम केला, पण बाजूच्या पुरंदर तालुक्यात विमानतळास विरोध करणाऱ्या, आपल्या जमिनी वाचवू पाहणाऱ्या वारकरी संप्रदायातील शेतकऱ्यांवर पोलिसांनी निर्घृण लाठीमार केला. हे चित्र काय सांगते? महाराष्ट्रात बसून जगातील मानवतेवर धडे द्यायचे व आपल्या राज्यात आपल्याच लोकांचे बळी घ्यायचे. फडणवीस हे वारकऱ्यांच्या मांडीस मांडी लावून बसतात व सरळ असत्य बोलतात. ‘तुका म्हणे सत्य सांगो। येवो रागे येतील ती।।’ या संतवचनाचे भान फडणवीस यांनी ठेवायला हवे, पण त्यांच्यातला जातिवंत गोडबोलेपणा म्हणजे खुशीची गाजरे दाखवून सत्ता भोगण्याचा डाव काही संपत नाही,” असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
बोलबच्चनगिरीने हे संकट दूर होईल काय?
“मुंबईतून मराठी माणसाचे उच्चाटन करून संपूर्ण मुंबई अदानी यांना देण्याचे कामही त्यांनी सिद्धीस नेले. पुन्हा महाराष्ट्र कल्याणाच्या गप्पा मारीत बोलबच्चनगिरी करायला ते मोकळे. एकेकाळी पोर्तुगीज या मुंबईचे सगळ्यात मोठे ‘लॅण्डलॉर्ड’ म्हणजे जमीनदार होते. आता देवेंदर, नरेंदर कृपेने पोर्तुगीजांच्या जागी अदानी यांना मुंबईचे जमीनदार केले. मराठी माणसाला देशोधडीस लावून त्यांच्या छाताडावर हा जमीनदार बसवला. उद्या राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीदेखील जातील. महाराष्ट्र सर्वच काही गमावून बसेल व फडणवीस मराठी माणसाला योग, प्राणायाम यांचे धडे देतील. फडणवीस यांनी योगदिनी आणखी एक बोलबच्चनगिरी केली ती म्हणजे, आळंदीच्या विकास आराखड्यात एका कत्तलखान्याचे आरक्षण दाखविण्यात आले आहे. तो कत्तलखाना मी होऊ देणार नाही, असे फडणवीस म्हणाले, पण महाराष्ट्र हा त्यांच्या राजवटीत शेतकरी वर्गासाठी कत्तलखाना झाला आहे आणि मुंबई, मराठी माणसांसाठी कत्तलखाना बनवला जात आहे त्याचे काय? महाराष्ट्राची शांतता, स्थिरता हरवली आहे. तणाव वाढला आहे. त्यातून आत्महत्या वाढत आहेत. योग, प्राणायाम आणि बोलबच्चनगिरीने हे संकट दूर होईल काय?” असा सवाल लेखाच्या शेवटी विचारण्यात आला आहे.