Maharashtra Politics : राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचे सूर जुळणार का, असा प्रश्न अख्या महाराष्ट्राला पडलाय. त्यात दादरच्या शिवसेना भवन परिसरात बॅनर लावत, पुन्हा ठाकरे सरकार येणार असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. या बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोबतच, या बॅनरवरच्या आशयाचे वेगवेगळे राजकीय अर्थही लावले जात आहेत.
भल्या पहाटेच दादरच्या शिवसेना भवनासमोर लागलेल्या या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. बँनरवर महाराष्ट्रात पुन्हा ठाकरेंचं सरकार येणार हा आशावाद व्यक्त केला आहे. मात्र, त्याआधी सूत्र जुळणार आणि समिकरणं बदलणार असंही म्हंटल आहे. आता ही जुळणारी आणि बदलणारी सूत्र आणि समिकरणं नेमकी कोणती?? याची चर्चा रंगली आहे.
हे बँनर झळकावणारे शिवसेना- ठाकरे पक्षाचे शिवसैनिक केवळ बॅनर लावून थांबले नाहीत. तर, या बॅनरवर जाहिर केलेली इच्छा पूर्णत्वास जावी म्हणून थेट गुवाहाटी जावून कामाख्या देवीला साकडंही घालणार आहेत.
शिंदेनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर गुवाहाटीतल्या कामाख्या देवीचा आशिर्वाद घेऊनच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठी घडामोड होण्याच्या बेतात असते तेव्हा देवी कामाख्याच्या या राजकीय भक्तांना हटकुन तिची आठवण येतेच येते. आताही देवी कामाख्याच्या आशिर्वादानं काही राजकीय चमत्कार होतायेत का येत्या काळात कळेलच.