समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. वारीमुळे रस्ते जाम होतात, पण मुस्लीम समाज कधीच तक्रार करत नाही. मात्र जर मुसलमानांनी नमाज पठण केले, तर तक्रार होते, असे विधान अबू आझमी यांनी केले.
.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी हे कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मोगल बादशाह औरंगजेबाचे उदात्तीकरण करत त्याला चांगला शासक म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकारण चांगलेच तापले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. या विधानामुळेही नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
अबू आझमी यांनी केलेल्या विधानाबाबत तुम्हाला काय वाटते, असे पत्रकारांनी विचारले. यावर बोलताना, मला वाटते की अबु आझमी यांना वादग्रस्त विधाने करण्याची आवड आहे. वादग्रस्त विधाने केली की प्रसिद्धी जास्त मिळते, असे त्यांना वाटते. त्यामुळेच मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही. त्यामुळेच मी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपुरात माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होते.
नेमके काय म्हणाले होते अबू आझमी?
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आज सोलापुरात माध्यमांशी बोलताना वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले. आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटे रस्त्यावर नमाज पठण करतात, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केले, तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितले लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते, असे अबू आझमी म्हणाले. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिम बाबतीत हे करत आहेत, असेही त्यांनी म्हटले.
हे ही वाचा…
ट्रम्प पंतप्रधान मोदींचे मित्र, पण भारताचे शत्रू:संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले- इराण-इस्रायल युद्धात काय झाले?
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या धगधगत्या संघर्षात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान येथील अणू उर्जा केंद्रांवर थेट हवाई हल्ले करत अमेरिका युद्धात उतरल्याचे चित्र आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट)च्या मुखपत्रातून अमेरिकी हस्तक्षेपावर जोरदार टीका करण्यात आली असून, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवरही कडवट शब्दांत घणाघाती टीका करण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा…