इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या धगधगत्या संघर्षात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान येथील अणू उर्जा केंद्रांवर थेट हवाई हल्ले करत अमेरिका युद्धात उतरल्याचे चित्र आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट)च्या मुखपत्रातू
.
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, गाझामधील नरसंहार इस्रायलने घडवला, पण ट्रम्प हे ते थांबवू शकले नाहीत. उलट, ते इराणला दम देत आहेत. त्यांच्या मित्रदेशांची टोळी जगात अराजक पसरवत आहे. ट्रम्प हे स्वतःला भारताचे मित्र म्हणवतात, पण भारताच्या शत्रूंना व्हाईट हाऊसमध्ये ‘डिनर’ला बोलवतात. पाकिस्तानी जनरल मुनीर, जो भारतात नरसंहार घडवतो, त्याला सन्मान दिला जातो, हे दुर्दैवी आहे. प्रे. ट्रम्प हे पंतप्रधान मोदींचे मित्र, पण भारताचे शत्रू आहेत. तर इराणने इस्रायल व प्रे. ट्रम्प यांच्या अहंकारावर हल्ला चढवला आहे!
नेमके राऊत काय म्हणाले?
संजय राऊत म्हणाले की, इराण-इस्रायल युद्ध जगाचे राजकारण बदलत आहे काय, हा प्रश्न आज सगळ्यांना पडला आहे. इस्रायलची गुंडागर्दी कोणीतरी थांबवायला हवी, असे किमान 70 टक्के जगाला वाटत आहे. इराणबरोबर युद्ध सुरू असतानाही इस्रायलने गाझापट्टीत रक्तपात थांबवलेला नाही. आतापर्यंत 60 हजार लोकांना इस्रायलने मारले. इराणशी लढाई सुरू असताना जेवणाच्या रांगेत उभ्या असलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करून किमान हजार लोकांना ठार केले. त्यात भुकेने व्याकूळ झालेल्या लहान मुलांचाही समावेश आहे. राज्यकर्ते इतक्या निर्घृण पद्धतीने कसे वागू शकतात? खास करून ज्या ‘ज्यू’ समाजाने हजारो वर्षे उपेक्षा आणि अत्याचार सहन केले, त्यांनी तरी असे अत्याचार दुसऱ्यांवर करू नये, पण इस्रायलने त्या अत्याचारांचे टोक गाठले. त्यामुळे इस्रायलवर इराणकडून बॉम्ब, ड्रोन पडू लागले तेव्हा जगातील अनेक राष्ट्रांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. इराणवर प्रेम आहे म्हणून या टाळ्या नव्हत्या, तर इस्रायलचेही कोणीतरी ‘गाझा’ करत आहे व जे दुःख गाझातील जनतेने भोगले तेच दुःख तेल ‘अविव’मधील जनतेच्या वाट्याला आले याचा हा आनंद असावा. इस्रायल अडीच हजार किलोमीटर दूर आपल्यापेक्षा 70 पट मोठ्या देशावर हल्ला करीत आहे याचे कौतुक अनेकांना वाटले, पण इराणने तितक्याच अंतरावरून इस्रायलवर प्रतिहल्ले सुरू केले व गोंधळ उडवून दिला तेव्हा इराणमधली राजवट फक्त मुल्लामौलवींची नाही, तर त्यांनीही आपल्या संरक्षणासाठी विज्ञानाची, संशोधनाची कास धरली व अमेरिकेचे भक्कम समर्थन असलेल्या इस्रायलला घाम फोडला हे दिसले.
तेलाच्या पैशांतून आलेल्या श्रीमंतीची चटक
संजय राऊत म्हणाले की, जगात 57 इस्लामिक राष्ट्रे आहेत. त्यातील अनेक देश ‘तेल’ विहिरींमुळे संपन्न आहेत. या सगळ्यांनी इराणला पाठिंबा दिला, पण उघडपणे कोणी समोर येत नाही. इस्लामच्या नावावर मुसलमान एकवटतात असे म्हटले जाते, पण इराणबाबत जे घडले त्यात ते दिसले नाही. कारण तेलाच्या पैशांतून आलेल्या श्रीमंतीची चटक या सगळ्यांना लागली आहे.
श्रीमंत, पण डरपोक
संजय राऊत म्हणाले की, सौदी-अरब, संयुक्त अरब अमिरात, इराक, कुवेत, कतार, दुबई, येमेन हे सर्व तेलाच्या पैशांनी श्रीमंत झालेले देश आहेत, पण इस्रायलच्या झुंडशाहीचा मुकाबला ते करू शकत नाहीत. जगातील सर्वोच्च शोध, संशोधन, विज्ञान, संरक्षण सिद्धता, सावकारी, अमेरिकेचा पाठिंबा इस्रायलच्या बाजूने आहे. त्यामुळे 57 इस्लामिक देश एकत्र येऊनही इस्रायलला धडा शिकवू शकत नाहीत या दंतकथेवर जोरदार हल्ला करण्याचे काम प्रथमच इराणने केले. युद्ध आज कोणालाच नको आहे. तरीही काही देशांना युद्धाची खुमखुमी आणि खाज आहे. अमेरिका, रशियासारख्या राष्ट्रांना त्यांची शस्त्रे, लढाऊ विमाने जगात खपवायची आहेत. युद्ध झाले नाही आणि जगात शांतता नांदली तर त्यांचा माल कसा संपणार? त्यांची अर्थव्यवस्थाच कोलमडून पडेल. स्वतःच्या देशाला समृद्ध करण्यासाठी हे सर्व देश लहान राष्ट्रांना, दहशतवादी गटांना झुंजवत असतात व झुंजणाऱ्या दोन्ही गटांना आणि देशांना शस्त्रे विकत घ्यायला लावतात. प्रे. ट्रम्प यांनी पाकिस्तानचा लष्करप्रमुख जनरल मुनीर याला बुधवारी रात्री ‘व्हाईट हाऊस’मध्ये खास ‘डिनर’साठी निमंत्रित केले. पाकिस्तानला बळ देण्याचाच हा प्रकार. दुसऱ्या महायुद्धानंतर जग शांततेच्या आणि स्थैर्याच्या शोधात होते. ज्ञान, विज्ञान, संशोधनाच्या मार्गाने सुखसमृद्धी सगळेच आणू पाहत होते. त्याच काळात हिटलरच्या अत्याचाराने पीडित एक संपूर्ण ‘वंश’ नष्ट होईल या भीतीने जगाने सर्व ज्यू लोकांना जर्मनीतून बाहेर काढले आणि अरब देशांच्या मधोमध एक सुरक्षित जमिनीचा तुकडा दिला. इस्रायल नावाचा एक नवा देश तेथे निर्माण झाला, पण जे स्वतःच पीडित होते, अत्याचार सहन करून उभे राहिले तेच श्रीमंती आणि सुबत्ता मिळताच जागतिक शांततेसाठी धोकादायक बनले व ते लोक भविष्यात इतके निर्घृण राज्यकर्ते बनतील याची कल्पनाच कोणी केली नव्हती. गाझातील नरसंहाराला दोन वर्षे होत आहेत. दोन वर्षांत 70 हजार पॅलेस्टिनींना इस्रायलने मारले. त्यात मोठ्या प्रमाणात लहान मुले आहेत. गाझाचे अक्षरशः वाळवंट केले. गाझाला पोहोचवली जाणारी रसद इस्रायलने बंद केली. दूध, पाणी, अन्न, औषधे पोहोचू दिली नाहीत. त्यामुळे मृतांचा आकडा रोज वाढत आहे. अन्नाच्या रांगेत उभ्या असलेल्या मुलांना अंदाधुंद गोळीबारात मारले जात आहे. एक छोटासा देश इस्रायल, जो चारही बाजूने अरब राष्ट्रांनी घेरला आहे. तो अशा प्रकारे अमानुष अत्याचार करतो. अमेरिकेच्या समर्थनामुळे तो असा बेबंद झाला, पण त्यांनी नवनवी हत्यारे बनवली. स्वतःसाठी सुरक्षा व्यवस्था, ज्यास आयर्न डोम म्हटले जाते. त्यामुळे आम्ही अजेय आणि पूर्ण सुरक्षित आहोत या अहंकारात ते होते. या अहंकाराच्या चिंधड्या इराणने उडवल्या. आयर्न डोम इराणी मिसाईलच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले. मीडिया हा अमेरिकाधार्जिणा आहे. तो इस्रायलकडे झुकला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराण किती बरबाद झालाय हे अतिरंजित पद्धतीने दाखवले जाते, पण इस्रायलचा अहंकार इराणने तोडला. राजधानी तेल अविव जळत आहे. इस्रायलच्या तेल विहिरी, ऊर्जा प्रकल्प, मोठ्या इमारती बेचिराख झाल्या. तेल अविवची अवस्था ‘गाझा’प्रमाणे झाली हे दाखवायला ते तयार नाहीत. अमेरिका, युरोपियन राष्ट्रांचा पाठिंबा इस्रायलला आहे तरीही इराण एकाकी झुंज देत आहे. सर्व जगाने आर्थिक कोंडी करूनही इराणसारखे राष्ट्र त्याच्या स्वाभिमानासाठी लढते आहे. इराण हा भारताचा परंपरागत मित्र आहे. यासर अराफत यांचे ‘पॅलेस्टाईन’ही भारताचाच मित्र. तरीही भारताचे परराष्ट्र धोरण याप्रश्नी साफ भरकटलेले आहे.
अराजकाची तयारी
संजय राऊत म्हणाले की, प्रे. ट्रम्प व त्यांच्या समर्थक देशांची टोळी जगात अराजक माजवीत आहेत. पुतीन यांना युक्रेन संपवायचे आहे. ट्रम्प यांना इराणमध्ये सत्तापालट करायचा आहे. जगात शांतता नांदावी असे यापैकी कुणालाच वाटत नाही. तरीही शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा अशी ट्रम्प यांची इच्छा आहे हे आश्चर्य आहे. प्रे. ट्रम्प गाझातला नरसंहार रोखू शकले नाहीत. हा नरसंहार ज्यांनी घडवला त्या इस्रायलच्या मागे ते आज उभे आहेत. कश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे 26 निरपराध्यांचे बळी घेणाऱ्या जनरल मुनीरला प्रे. ट्रम्प ‘डिनरला’ बोलावतात आणि आपण शांतिदूत असल्याचा आव आणतात. अशा ट्रम्प यांच्यासाठी मोदी यांनी भारतात प्रचाराचा नारळ फोडला. आता तेच ट्रम्प भारतावर उलटले आहेत! आजही पंतप्रधान मोदी प्रे. ट्रम्प यांना आपला प्यारा दोस्त समजत आहेत काय? असा सवाल राऊतांनी केला आहे.