हिंगोली जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सुरू केलेल्या संजीवनी अभियानात १४५४२ महिलांच्या आरोग्य तपासणीमध्ये ९९६ महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दुसरी चाचणी सुरू करण्यात आली आहे. या अहवालानंतरच नेमक्या किती महिलांना कर्करोग झाला आहे,
.
हिंगोलीत जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत संजीवनी अभियान हाती घेण्यात आले होते. यामध्ये महिलांना झालेल्या कर्करोगाची तातडीने माहिती मिळून त्यांच्यावर शक्य तेवढ्या लवकर उपचार सुरू करण्याचा उद्देश होता. या अभियानात गावपातळीवरील ३० वर्षावरील महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांची माहिती गोळा करण्यात आली होती.
दरम्यान, जिल्हाधिकारी गोयल यांच्या बदलीनंतर विद्यमान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी या उपक्रमाला गती देत संशयीत असलेल्या महिलांची तालुकास्तरावर स्क्रिनींग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गणपत फोफसे यांनी पाचही तालुक्यातील महिलांची तज्ज्ञांमार्फत स्क्रिनींग केली होती. यामध्ये १४५४२ महिला संशयीत आढळून आल्या होत्या. या सर्व महिलांची प्रथम चाचणी केल्यानंतर त्यापैकी ९९६ महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्या आहेत.
यानंतर आता या महिलांची दुसरी चाचणी शासकीय रुग्णालय व कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. या चाचणीच्या अहवालानंतरच नेमक्या किती महिलांना कर्करोग आहे, हे स्पष्ट होणार आहे. या महिलांना संदर्भसेवा देत कर्करोग तज्ज्ञांकडून तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार सुरू केले जाणार आहे. कर्करोगग्रस्त महिलांच्या आजाराचे निदान लवकर झाल्यामुळे त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य होऊन त्यांची या आजारातून मुक्तता करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.