Bhaskar Jadhav : काही दिवसांपूर्वी झी 24 तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीमधून भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. भरत गोगावलेंच्या या आरोपांना टू द पॉईंट या कार्यक्रमातूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी प्रत्युत्तर दिले आहे. भास्कर जाधवांनी भरत गोगवलेंची लाज काढली आहे. यानंतर भरत गोगवले यांनी पुन्हा एकदा भास्कर जाधव यांच्या या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या या स्फोटक मुलाखतीत भास्कर जाधव यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.
शिवसेनेच्या राजकीय निर्णयांमध्ये रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप असल्याचा गंभीर आरोप रोहयोमंत्री भरत गोगावलेंनी केला होता. रश्मी ठाकरेंचा शिवसेनेच्या तिकीट वाटपात हस्तक्षेप असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंचं ऐकत असल्याचा दावाही भरत गोगावलेंनी केला. आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदासाठी रश्मी ठाकरेंनी हट्ट धरला त्यामुळंच शिवसेना फुटल्याचा आरोपही त्यांनी केलाय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणखी एक मंत्रिपद घरात देण्याची गरज काय होती असा सवालही गोगावलेंनी केला होता. आदित्य ठाकरेंऐवजी मंत्रिपद सामान्य शिवसैनिकाला मंत्रिपद दिलं असतं तर शिवसेना फुटली नसती असंही गोगावले म्हणाले होते.
रश्मी ठाकरेंवरील हस्तक्षेपाचे आरोप बिनबुडाचे असल्याचं भास्कर जाधवांनी म्हटल आहे. दरम्यान ज्या ठाकरेंमुळे सर्व राजकीय पदं उपभोगली त्याच ठाकरेंवर टीका, आरोप करताना लाज वाटली पाहिजे अशी सडकून टीकाही भास्कर जाधवांनी शिंदेंच्या आमदारांवर केली. रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत असं भास्कर जाधव म्हणाले.
भास्कर जाधव यांनी लाज काढल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. काही काळाने भास्कर जाधव यांना पण लाज नाही वाटली तर आम्हाला विचारा. भास्कर जाधवांचे काय चाललं आहे ते तुम्हाला थोड्याच दिवसात कळेल. भास्कर जाधवांनी हे वक्तव्य परत घेऊन दुसरं वक्तव्य नाही केलं तर आम्हाला विचारा असं भरत गोगावले म्हणाले.