महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषा सक्तीवरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वप्रथम शाळेत तिसरी भाषा हिंदी सक्तीची करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने देखील याविरोधात आवाज उठव
.
मागल्या दाराने मराठी द्वेषी भाजपचे काय चालले आहे?
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले, कुठल्याही भाषेला विरोध नाही, पण त्या भाषेच्या सक्तीला विरोध आहेच! त्याविरुद्ध आंदोलन सुरु असताना आणि मराठी माणूस पेटून उठलेला असताना, आपल्या लक्षात येत आहे का की मागल्या दाराने मराठी द्वेषी भाजपचे काय चालले आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.
मराठी भाषा भवनाच्या कामाला मुद्दाम उशीर
पुढे आदित्य ठाकरे म्हणतात, गिरगाव चौपाटी येथे उद्धवसाहेबांनी मुंबईत सुरु केलेले ‘मराठी रंगभूमी दालन’ गुपचूप रद्द करायचे, तिसरीकडे मराठी भाषा भवनात इतर कार्यालये घुसवून त्याचे महत्व कमी करायचे आणि त्यातूनही मराठी भाषा भवनाच्या कामाला मुद्दाम उशीर करुन घोंगडे भिजवत ठेवायचे! हे सगळे कशासाठी करत आहे भाजप? गिरगाव चौपाटी येथे मराठीला विरोध कोणाचा असेल? स्थानिकांचा तर नव्हता, मग स्थानिक भाजप आमदाराने केला का? की कुठल्या बिल्डर मित्राला ती जागा देणार आहेत? असा थेट सवालच आदित्य ठाकरे यांनी भाजपला उद्देशून विचारला.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, या प्रश्नांचे उत्तर महाराष्ट्र द्वेष्टे भाजप देणार का? आणि यांचा हा खेळ आपण मुंबईकर वेळेत ओळखणार का? असा प्रश्न त्यांनी मुंबईकरांना विचारला आहे.
दरम्यान, आगामी स्थानिक निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्या अनुषंगाने आता सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेकडे लागले आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली जात आहे, तसेच भाजपकडून देखील राज ठाकरेंना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईत मराठी मतांसाठी राज ठाकरे हे गेम चेंजर ठरू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.