बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र संतापले होते. त्यानंतर आरोपी वाल्मीक कराडसह इतर आरोपींना अटक करत मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे असले तरी देखील बीडमधील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेताना
.
बीड जिल्ह्यातील धारूरमध्ये उसने पैसे वसूल करण्यासाठी चौघांनी मिळून एका तरुणांचे अपहरण केले आहे. मुलाच्या घरी फोन करून मुलगा जीवंत हवा असेल तर आताच्या आत्ता 50 हजार रुपये टाका अन्यथा मुलगा तुम्हाला परत दिसणार नाही, अशी धमकी दिली आहे. हा प्रकार समोर येताच जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली. धारूर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तपास करत दोघांना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ 10 हजार रुपयांच्या उसने व्यवहारावरून तब्बल 80 हजार रुपयांची वसुली करत एका तरुणाचे अपहरण करण्यात आले. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून, अपहरण झालेल्या तरुणाचे नाव कृष्णा मैंद आहे. काही महिन्यांपूर्वी कृष्णाने धनराज चाटे, पृथ्वीराज राग आणि परमेश्वर आगाव यांच्याकडून 10 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, आरोपींनी दररोज 1 हजार रुपयांचे व्याज आकारल्याने ही रक्कम 80 हजार रुपयांपर्यंत गेली.
पैसे वसूल करण्याच्या उद्देशाने आरोपींनी कृष्णाचे अपहरण केले आणि त्यानंतर त्याच्या आईला फोन करून धमकी दिली, मुलगा जिवंत पाहिजे असेल, तर 50 हजार रुपये पाठवा, अन्यथा तो कधीच दिसणार नाही. या धमकीमुळे घाबरलेल्या आईने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कारवाई करण्यास सुरुवात केली.
धारूर पोलिसांनी तपास करत अंबाजोगाई जवळील साकुर येथून दोघांना अटक केली, तर दोघे अद्याप फरार आहेत. अपहरण झालेल्या कृष्णा मैंद याची सुटका करत अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिस कसून चौकशी करत आहेत. आरोपींनी कृष्णाला 10 हजार दिले होते त्याला दररोज एक हजार रुपये व्याज लावला होता. त्याचे एकूण 80 हजार रुपये झाल्याने कृष्णाचे अपहरण करत त्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे.