राज्यात अनेक ठिकाणी दमदार सरींची शक्यता, आयएमडीने अनेक शहरांसाठी जारी केला अलर्ट


Maharashtra Weather Update: गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागानं (IMD) देशातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. २० जूनपासून २५ जूनदरम्यान उत्तर आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० ते २५ जून दरम्यान हरियाणा, पंजाब, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि लडाख या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर, दक्षिण-पश्चिम मान्सून लवकरच उत्तर भारतात अधिक सक्रिय होणार असून, २२ जूनपर्यंत मान्सून दिल्ली, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांमध्ये पोहोचेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

महाराष्ट्र आणि गुजरामध्ये पाऊसाची जोरदार बॅटिंग 

सततच्या पावसामुळे पश्चिम भारतात विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क असून,  नागरिकांना सुरक्षित राहण्यास सांगितले जात आहे.

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. तर काही भागात पाऊस कोसळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवसांसाठी विविध भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार संपूर्ण कोकण, धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर, अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकणात रविवार, सोमवार आणि मंगळवार जोरदार पावसाची शक्यता आहे.

मे महिन्यात जोरदार पाऊस 

मे महिन्यात पावसाने मुंबईकरांना चांगलंच भिजवलं. मोसमी पावसाच्या आगमनाआधीच वळवाच्या सरींनी शहरात दमदार हजेरी लावली. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरल्याने मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार सरी कोसळल्या. १ मे ते २७ मे या काळात मुंबईत तब्बल ६००.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, यंदा मोसमी पाऊस २६ मे रोजीच मुंबईत दाखल झाला, जो अपेक्षेपेक्षा खूप आधीच पोहोचला. १९१८ साली मे महिन्याच्या संपूर्ण काळात म्हणजेच १ ते ३१ मे दरम्यान २७९.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, तब्बल १०७ वर्षांनंतर २०२५ मध्ये या विक्रमाला मागे टाकत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

या अवकाळी आणि वेळेपुर्वीच्या पावसामुळे मुंबईतील तापमानात घट झाली आणि उन्हाची तीव्रता कमी झाली. मात्र, मुसळधार पावसामुळे काही भागांत पाणी साचण्याच्या समस्या देखील उद्भवल्या. तरीही, मे महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळणे ही एक ऐतिहासिक नोंद ठरली आहे.

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24