Ramdas Kadam On Uddhav Thackeray Speech: शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणातून महायुतीच्या नेत्यांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी राज-उद्धव एकत्र येण्यावरही भाष्य केले. तुमच्या मनात आहे तेच होईल, असे म्हणत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर प्रहार केलाय.
उद्धव ठाकरे हे मला गाडीत घेतल्या शिवाय मातोश्रीबाहेर पडत नव्हते आणि आज ते उद्धव ठाकरे म्हणताय की, ॲम्ब्युलन्स घेऊन या?. हे बोलण्याची तुम्ही कुवत आणि धमक आहे का? आता कोण रामदास कदम तुमच्यासोबत आहे? शिवसैनिकांना फक्त ते दाखवत आहेत. उद्धव ठाकरे हे मेले नाहीत जिवंत आहेत, त्या अनुषंगाने कालचे त्यांचं भाषण होत, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिलीय.
राज ठाकरेंकडे युतीची भीक मागतायत
यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेवरही भाष्य केले. उद्धव ठाकरे आता हातात भीकेचा कटोरा घेऊन राज ठाकरेंकडे युतीची भीक मागत आहे. बाबा मला युतीची भीक दे, असं म्हणतायत, असे रामदास कदम म्हणाले. उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंवर भाऊ म्हणून प्रेम नाहीय तर पालिकेसाठी करत असल्याची टीका त्यांनी केलीय.
एका म्यानात 2 तलवारी
एकेकाळी बाळा नांदगावकर आणि मी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, एक म्यान में दो तलवारे नहीं होती. तेव्हा राज ठाकरे यांना सोबत घेतलं नाही आणि आता भीक मागताय. राज ठाकरे काय मागत होते? फक्त पुणे आणि नाशिक. मात्र तेही उद्धव ठाकरे यांनी दिले नाही. आज मुंबई पाहापलिकेसाठी युती करा म्हणताय, असे ते म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर राज ठाकरे यांचं मोठं नुकसान होईल, असेही त्यांनी सांगितले. मराठी माणसाला तुम्ही मुंबईतून बाहेर काढले आणि आता त्यांच्यासाठी तुम्ही एकत्र येणार म्हणताय का? तुम्ही मराठी माणूस संपवल्याची टीका कदमांनी केली.राज ठाकरे आणि फडणवीसांची जी भेट झाली त्यावर फडणवीसांनी खुलासा केलाच आहे. राज ठाकरे एवढे दुधखुळे आहेत का? जेवायला बसले आणि निर्णय बदलला? असेही ते म्हणाले. रश्मी ठाकरे या मुलगा म्हणून आदित्य ठाकरे यांच्यासाठी आग्रही होत्या मात्र उद्धव ठाकरे निर्णय घेऊ शकतं नाही का? निर्णय घेताना कोणी बायकोच ऐकत का? असा प्रश्न रामदास कदमांनी विचारला.
आम्ही गोगावलेंच्या पाठिशी
रायगड जिल्ह्यात महायुतीत वाद आहेत हे मी मान्य करतो. याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. तटकरे फक्त स्वतःच्या मुलीच्या मतदारसंघावर निवडणून नाही आले. आम्ही त्यांना मदत केली. मात्र विधासभेत राष्ट्रवादीची आम्हाला मदत झाली नसल्याचेही रामदास कदम म्हणाले. पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहेत म्हणून भरत गोगावले यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र आमचा दावा कायम आहे. भरत गोगावले पालकमंत्री होऊ नये यासाठी रचलेला हे कटकारस्थान आहे.गोगावलेंच कोणीही वाकडं करू शकणार नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. अघोरी पूजा काय असते? हे उद्धव ठाकरे यांना विचारा, असेही ते म्हणाले.
हिंदी सक्ती
इंग्रज गेले आपण आज इंग्रजी भाषा बोलतोच. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, हिंदीभाषा केंद्र पातळीवर घेतला हा निर्णय त्यामुळे काही करू शकत नाही. आता हा निर्णय योग्य की अयोग्य हे वरिष्ठ नेते सांगतील, असेही रामदास कदमांनी सांगितले.