स्वातंत्र्यदिनी कल्याण-डोंबिवलीत मांसविक्री बंदी



स्वातंत्र्य दिनी (15 ऑगस्ट) मांस दुकाने बंद ठेवण्याच्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयावर तीव्र टीका केली आहे. त्या दिवशी ‘मटण पार्टी’ आयोजित करणार असल्याचे म्हटले आहे.

कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेने एक नोटीस जारी करून 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत, असे 24 तास सर्व कत्तलखाने आणि परवानाधारक मांस विक्रेत्यांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आणि मोठ्या जनावरांच्या मांसाचा समावेश आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 नुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे.

या निर्णयामुळे नागरिकांच्या खाण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात असून, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

ज्या दिवशी आम्हाला स्वातंत्र्य मिळाले, त्याच दिवशी तुम्ही आम्हाला काय खायचे याचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहात. मी त्या दिवशी मटण पार्टी आयोजित करण्याचा विचार करत आहे. हे खूप जास्त होतंय. लोकांनी काय खावे आणि केव्हा खावे हे ठरवणारे तुम्ही कोण? असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.  

पालिकेच्या परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवशी सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आणि जुन्या प्रशासकीय ठरावांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाच्या आदेशानुसार, महावीर जयंती, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन यांसारख्या महत्त्वाच्या दिवशी शहरातील मांस विक्रीची दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24