ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो- 5 च्या बांधकामस्थळी दोन दिवसांपूर्वी एक लोखंडी रॉड रिक्षावर पडून त्यातील प्रवासी गंभीररीत्या जखमी झाला होता. या घटनेची उच्च न्यायालयाने गुरुवारी स्वतःहून दखल घेतली.
तसेच, सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देऊनही त्या अभावी वारंवार होणाऱ्या अशा अपघातांबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या घटनेच्या निमित्ताने बहुमजली इमारतींच्या बांधकामस्थळांवरील सुरक्षा त्रुटींबाबत दाखल केलेली याचिकाही न्यायालयाने यावेळी पूर्ववत केली.
वरळी येथे दोन वर्षांपूर्वी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 52 व्या मजल्यावरून एक मोठा सिमेंट ब्लॉक पडला होता आणि या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या अनुषंगाने मार्च 2023 मध्ये याचिका दाखल झाली होती.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने 5 ऑगस्ट रोजी घडलेल्या अपघाताच्या निमित्ताने ही याचिका पुन्हा सुनावणीसाठी घेण्याचे स्पष्ट केले. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, समितीच्या शिफारशी सर्व नियोजन अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या नाहीत याबाबतही न्यायालयाने संताप व्यक्त केला.
सोनू अली रमजान अली शेख (22) असे जखमी मुलाचे नाव आहे. तो मंगळवारी दुपारी धामणकर नाका येथून विठ्ठल नगरच्या दिशेने रिक्षातून प्रवास करत होता. भिवंडी येथे ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो पाच प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सुरू आहे.
मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी लागणारा लोखंडी राॅड रिक्षात बसलेल्या सोनू अली याच्या डोक्यात शिरला. या घटनेनंतर सोनू याला स्थानिकांनी तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
सोनूवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. त्याच्या डोक्यात दोन ते तीन इंच राॅड आत गेल्याचेही डाॅक्टर म्हणाले. त्याच्यावर मंगळवारी रात्री शस्त्रक्रिया देखील पार पडली. शस्रक्रीयेनंतरही गंभीर जखमी असलेल्या या प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा
गायमुख घाट रोड तीन दिवस जड वाहनांसाठी बंद