मुंबईतील (mumbai) कबुतरखान्यात तणावाचे वातावरण दिसून येत आहे. दादर कबुतरखान्यात बीएमसी (bmc) बंदीला विरोध करणाऱ्या जैन आंदोलकांनी प्लास्टिक शेड तोडून तेथील बांबू हटवले आहे.
त्यानंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीएमसीने ताडपत्री लावून कबुतरखाना बंद केला होता.
तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत महानगरपालिकेला सूचना दिल्या होत्या की कबुतरखाना बंद करण्याऐवजी तेथे पक्ष्यांना नियंत्रित पद्धतीने खायला द्यावे.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी दादर कबुतरखान्यावरील ताडपत्री काढून टाकण्याचे आदेशही दिले होते. मात्र, मुंबई (mumbai) महानगरपालिकेने ताडपत्री काढण्यास विलंब केल्याने बुधवारी जैन समुदाय खूपच आक्रमक झाला.
बुधवारी जैन समाजातील (jain society) आंदोलकांनी कबुतरखान्यावर चढून बांबू तोडले. जैन समाजातील काही महिलांनी सोबत आणलेल्या चाकू आणि ब्लेडने ताडपत्री बांधण्यासाठी आणलेली सुतळी कापली.
जैन समाजासाठी कबुतरांना खाद्य देणे हा धार्मिक प्रथेचा भाग आहे. महापालिकेने केलेल्या या कारवाईमुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
जैन समाजातील काही जणांनी भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जैन समाजाची मागणी मान्य करीत सपशेल माघार घेतल्याची टीका शिवसेना (ठाकरे) व मनसेने केली आहे.
कबुतरखान्यांबाबत जैन धर्मीयांच्या मताचाही आदर आहे. मात्र कबुतरांमुळे क्षयरोगासारखा आजार पसरत असेल तर कबुतरखान्यांच्या परिसरात अशा प्रकारचे किती रुग्ण आढळले याचेही सर्वेक्षण होणे गरजेचे असल्याचे ठाकरे गटाचे स्थानिक आमदार महेश सावंत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा