महाराष्ट्राच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना. महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले?, मते वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड केली का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
.
विधानसभा निवडणुकीमध्ये ‘पैशाचा पाऊस’ आणि ‘ईव्हीएम’ घोटाळ्याविरोधात राज्यभरात विरोधक आक्षेप घेत आहेत. पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश आंदोलन केले. यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मिडीयावर सर्व आपले मत व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, लोकशाही ही लोकांच्या विश्वासावर अवलंबून असते. हे प्रश्न अनुत्तरीत राहिल्यास त्यावरून नक्कीच विश्वास उडेल. मतदार नोंदणी आणि मतमोजणीत पारदर्शकता आणावी अशी आमची मागणी आहे. लपवण्यासारखे काहीही नसेल, तर ECI ने या तपासणीचे स्वागत केले पाहिजे. आपल्या लोकशाहीच्या पायाचे रक्षण करण्याची प्रचंड गरज आज आहे.
नेमके जितेंद्र आव्हाडांचे ट्विट काय?
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, महाराष्ट्राच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना ! ECI नुसार, महाराष्ट्रातील एकूण मतदार 9,64,85,765 आहेत आणि यंदा मतदानाची टक्केवारी 65.02% होती. साधे गणित आहे. – 65.02% of 9,64,85,765 = 6,27,35,044.4 परंतु ECI ने 6,40,88,195 लोकांनी मतदान केल्याची नोंद केली आहे. यात अतिरिक्त 13,53,151 मते आहेत.
इतकेच नाही, तर 65.02% केल्यास त्यात 0.4 मतं असं गणित येतं.
- राज्यातच काय, संपूर्ण विश्वात अपूर्णांक मतं कशी असू शकतात?
- 13 लाख अतिरिक्त मते आली कुठून?
आता मतदार नोंदणी पाहू. 2019 ते 2024 (5 वर्षे) महाराष्ट्रातील मतदारांची संख्या 50 लाखांनी वाढली, म्हणजे सरासरी प्रतिवर्षी 10 लाख. पण 2024 च्या सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अवघ्या 6 महिन्यांत मतदारांची संख्या 42 लाखांनी वाढली. 6 महिन्यांत 42 लाख वाढ म्हणजे 84 लाख/वर्षाचा वाढीचा दर, जो गेल्या 5 वर्षांतील सरासरी वार्षिक दराच्या 8.4 पट आहे! हा मतदार नोंदणीचा चमत्कार आहे कि मतांमध्ये फेरफार आहे, हे तुम्हीच ठरवा.
मतांमधील या विसंगती दोन गंभीर प्रश्न निर्माण करतात
- मतं वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड केली का?
- ECI चुकीचा किंवा फेरफार केलेला डेटा प्रकाशित करत आहे का?
दोघांपैकी काही जरी झालं असेल, तरी हा प्रकार निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी करतोय.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले पाहिजे
- 13 लाख अतिरिक्त मते का आहेत?
- महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले?
- ईव्हीएमचे स्वतंत्र ऑडिट केले जात आहे का?
लोकशाही ही लोकांच्या विश्वासावर अवलंबून असते. हे प्रश्न अनुत्तरीत राहिल्यास त्यावरून नक्कीच विश्वास उडेल. मतदार नोंदणी आणि मतमोजणीत पारदर्शकता आणावी अशी आमची मागणी आहे. लपवण्यासारखे काहीही नसेल, तर ECI ने या तपासणीचे स्वागत केले पाहिजे. आपल्या लोकशाहीच्या पायाचे रक्षण करण्याची प्रचंड गरज आज आहे.